
राज्यात महायुतीचं सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प मांडत आहेत. वर्ष 2026-2027 च्या अर्थसंकल्पात त्यांनी वेगवेगळ्या घोषणा केल्या आहेत. खरंतर अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ आली. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री होते. त्यांनी आतापर्यंत अनेकवेळा अर्थसंकल्प मांडला. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना हा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना पहिल्या दहा काय घोषणा केल्या आहेत ते जाणून घ्या.
महात्मा फुले यांच्या जयंतीला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने एक समिती स्थापन करून विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात येतील.
संत गाडगेबाबांचं 150 वं जयंती वर्ष आहे. त्यामुळे एक सर्किट तयार करणार. संत गाडगेबाबा ग्राम योजना राबवणार.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड येथील चवदार तळ्याच्या सोयीसुविधांसाठी तरतूद करण्यात येणार आहे.
२०२६-२०२७ हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या दादरमधील स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. अंतिम काम जूनपर्यंत होईल.
संत तुकाराम महाराज बीज सोहळा झाला. देहू येथील तुकारामांच्या जन्मस्थानाचं जतन आणि संवर्धन करू.
16 व्या वित्त आयोगाच्या शिफारशी नुसार केंद्राकडून भरीव निधी प्राप्त होणार आहे. सहाव्या वित्त आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली होती. त्यांचा अहवाल राज्यपालांच्या मान्यतेनंतर पटलावर ठेवण्यात येईल.
1 फेब्रुवारी 2026 रोजी युवा केंद्रीत अर्थसंकल्प सादर केला. मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. विकसित महाराष्ट्रात आपला वाटा सर्वात मोठा असेल.
बळीराजाला केंद्रस्थानी ठेवून 10 ते 15 ठिकाणांसाठी एकत्रित मूल्य साखळी तयार केली जाईल.
संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. महिला गोपालक, कुक्कुटपालकांसाठी विशेष योजना करण्यात येणार आहे.
1 कोटीची मुख्यमंत्री मत्स्य योजना करण्यात येत आहे.