
इराण आणि अमेरिका यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. इराणकडून अनेक आखाती देशांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. अशातच आता इस्लाम धर्मातील पवित्र ईद-उल-फितर हा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त मुस्लिम बांधव खुल्या मैदानात नमाज पठण करत असतात. मात्र आता संयुक्त अरब अमिरात (UAE) ने ईद-उल-फितर संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. यावर्षी मोकळ्या मैदानात किंवा रस्त्यावर ईदची नमाज अदा न करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. नमाज फक्त मशिदींमध्येच अदा करावी असी सूचना नागरिकांना देण्यात आली आहे. यूएईच्या जनरल अथॉरिटी ऑफ इस्लामिक अफेयर्सने ही माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली आहे.
अनेक आखाती देशांमध्ये ईद-उल-फितरची नमाज मोठ्या मोकळ्या मैदानात एकत्रितपणे अदा केली जाते, परंतु यावेळी तसे होणार नाही. युएई प्रशासनाने नागरिकांना मशिदींमध्ये जाऊन नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे, यूएईची एअर डिफेन्स सिस्टम सतत मिसाईल आणि ड्रोन हल्ले रोखण्यात गुंतलेली आहे. अनेक ड्रोन हवेतच निकामी केले जातात. मात्र काही ठिकाणी अवशेष पडल्यामुळे किरकोळ नुकसान झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा अवशेषांचा धोका टाळण्यासाठी मशिदींमध्येच नमाज अदा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इराणने रास लफान इंडस्ट्रियल सिटी (कतार) वर हल्ला केला, जो जगातील सर्वात मोठा LNG निर्यात केंद्र मानला जातो. या हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय खाडी देशांमधील तेल आणि गॅस प्रकल्पांनाही लक्ष्य करण्यात आले, ज्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. इराणने यूएईमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवरही क्षेपणास्त्र हल्ले केल्याचे समोर आले आहे. जगातील सुरक्षित शहरांपैकी एक मानले जाणाऱ्या दुबईतील नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, अलिकडेच सौदी अरेबिया ची राजधानी रियाध येथे अरब आणि इस्लामिक देशांची बैठक पार पडली. यात अनेक देशांनी इराणच्या हल्ल्यांचा निषेध केला. फैसल बिन फरहान अल साउद यांनी सांगितले की सौदी अरेबियाला आपल्या देशाच्या आणि आर्थिक हितसंबंधांच्या रक्षणासाठी लष्करी कारवाई करण्याचा अधिकार आहे. संपूर्ण खाडी प्रदेशात परिस्थिती तणावपूर्ण आहे. याच कारणामुळे ईदच्या निमित्तानेही लोकांना सुरक्षित ठिकाणी राहून इबादत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.