Budget 2026: ज्या राज्यांमध्ये निवडणुका तिथेच पायघड्या! तामिळनाडूपासून पश्चिम बंगालपर्यंत घोषणांचा पाऊसच पाऊस
Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी सर्वसाधारण अर्थसंकल्पात तामिळनाडू आणि पश्चिम बंगालसह ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्यांच्यासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा केली. आता या घोषणा काय आहेत वाचा...

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी लोकसभेत २०२६-२७ चा सामान्य अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली आहे. यंदा पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, पुदुचेरी आणि केरळ या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केरळ वगळता इतर चार राज्यांमध्ये मार्च किंवा एप्रिलमध्ये निवडणुका होऊ शकतात. या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांनी अनेक प्रकल्पांची घोषणा केली आहे.
रेअर अर्थ मिनरल्ससाठी डेडिकेटेड कॉरिडॉर
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात सांगितले की, ओडिसा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात समर्पित मिनरल पार्क बांधली जातील. याशिवाय, वाराणसी ते सिलीगुडीपर्यंत रेल कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच, केरळ आणि तमिळनाडूसह इतर राज्यांमध्ये रेअर अर्थ कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा केली आहे.
तमिळनाडू, केरळसह चार राज्यांमध्ये रेअर अर्थ कॉरिडॉर
रेअर अर्थ मिनरल्समध्ये चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी चार राज्यांमध्ये (तमिळनाडू, केरळ, ओडिशा आणि आंध्र प्रदेश) मिनरल्ससाठी डेडिकेटेड कॉरिडॉर तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, “रेअर अर्थ परमानेंट मॅग्नेटची योजना नोव्हेंबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आली होती.”
त्या पुढे म्हणाल्या, “आता आम्ही ओडिशा, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू सारख्या मिनरल-समृद्ध राज्यांना खाणकाम, प्रक्रिया, संशोधन आणि उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी डेडिकेटेड रेअर अर्थ कॉरिडॉर स्थापन करण्यास मदत करण्याचा प्रस्ताव ठेवत आहोत.”
वाराणसी ते सिलीगुडीपर्यंत रेल कॉरिडॉर
अर्थमंत्र्यांनी भारताच्या हाय-स्पीड रेल्वेच्या महत्वाकांक्षांना चालना देणारी घोषणा केली. अर्थसंकल्पात सात हाय-स्पीड रेल कॉरिडॉरचा प्रस्ताव ठेवला आहे. याचा उद्देश टियर-२ आणि टियर-३ शहरांना मोठ्या शहरी केंद्रांशी जोडणे, रेल्वेला रस्ते आणि कमी अंतराच्या हवाई प्रवासाचा स्वच्छ, वेगवान पर्याय म्हणून पुन्हा स्थापित करणे आहे.
अर्थसंकल्पानुसार, पुणे-मुंबई, पुणे-हैदराबाद, हैदराबाद-बंगळुरू, बंगळुरू-चेन्नई, हैदराबाद-चेन्नई, दिल्ली-वाराणसी, वाराणसी-सिलीगुडी या मार्गांना ग्रोथ कनेक्टर म्हणून विकसित केले जाईल. तसेच येथे रेल कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव आहे. हे कॉरिडॉर पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि पूर्व भागांना जोडतात. यामुळे औद्योगिक हब, टेक्नॉलॉजी सेंटर, तीर्थक्षेत्रे आणि उदयोन्मुख शहरी समूहांना जलद, अधिक एकात्मिक नेटवर्कमध्ये आणणे. याशिवाय, अर्थमंत्र्यांनी दुर्गापूरला उत्तर-पूर्व औद्योगिक कॉरिडॉरशी जोडण्याची घोषणा केली.
पूर्व भारतात ऑल इंडिया इंस्टीट्यूट फॉर डिझायनिंग
निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, सरकार ICAI, ICSI सारख्या व्यावसायिक संस्थांना शॉर्ट टर्म मॉड्युलर कोर्स डिझाइन करण्यास मदत करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. त्यांनी सांगितले की, खासगी भागीदारीत ५ मेडिकल हब तयार केले जातील. भारतात ३ नवीन ऑल इंडिया इंस्टीट्यूट फॉर आयुर्वेद स्थापन केले जातील. मेडिकल टुरिझमसाठी इन्फ्रास्ट्रक्चर विकसित केले जाईल. तसेच, पूर्व भारतात ऑल इंडिया इंस्टीट्यूट फॉर डिझायनिंग स्थापन करण्याची घोषणा केली. उच्च शिक्षणात महिलांच्या सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला वसतिगृहे बांधली जातील.
