AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-अमेरिका व्यापार कराराचा डेअरी उत्पादनांवर काय परिणाम होणार? अमूलच्या एमडींनी दिली महत्त्वाची माहिती

Jayen Mehta : भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार कराराची घोषणा झाली आहे. डेअरी उत्पादनांवर याचा परिणाम होणार आहे. याबाबत अमूलचे एमडी जयेन मेहता यांनी माहिती दिली आहे.

भारत-अमेरिका व्यापार कराराचा डेअरी उत्पादनांवर काय परिणाम होणार? अमूलच्या एमडींनी दिली महत्त्वाची माहिती
Jayen Mehta on ind us dealImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Feb 09, 2026 | 10:44 PM
Share

गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि अमेरिकेतील संबंध ताणलेले होते, मात्र आता हे संबंध सुधारायला सुरुवात होणार आहे. कारण दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराची घोषणा झाली आहे. यामुळे भारताच्या विविध क्षेत्रातील निर्यातीला चालना मिळणार आहे. डेअरी उत्पादनांवरही याचा परिणाम होणार आहे. देशातील सर्वात मोठ्या दूध कंपन्यांपैकी एक असलेल्या अमूलचे एमडी जयेन मेहता यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

डेअरी उत्पादकांना फायदा होणार

टीव्ही 9 नेटवर्कशी बोलताना जयेन मेहता यांनी म्हटले की, अमेरिकेसोबत झालेल्या कराराबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पीयूष गोयल यांचे आभार मानतो. सरकारने या डीलमध्ये कृषी आणि डेअरी उत्पादकांचे हिताचे रक्षण करण्याचे काम केले आहे. याचे दोन फायदे आहेत. पहिला म्हणजे भारताच्या निर्यातीवर लागणारा कर आता 18 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. दुसरा म्हणजे अमेरिकन कृषी आणि दुग्ध उत्पादने भारतात पाठवली जाणार होती, मात्र आता ती येणार नाहीत, त्यामुळे भारतीय उत्पादकांना फायदा होणार आहे. यामुळे भारतीय डेअरी क्षेत्राशी जोडलेले 8 ते 10 कोटी कुटुंबे सुरक्षित स्थितीत आहेत. तसेच नवीन व्यापाराची संधी निर्माण झाल्याने आणि कर कमी झाल्याने डेअरी उत्पादकांना याचा फायदा होणार आहे.

भारताची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याची संधी

भारत आणि अमेरिकेतील करार हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे का? यावर बोलताना जयेन मेहता यांनी म्हटले की, ही भारतीय शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे, कारण भारत हा जगातील सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश आहे, जगातील एक चतुर्थांश दूध उत्पादन भारतात होते. आगामी काळात भारतातील दूध उत्पादन आणखी वाढणार असून 10 वर्षांनी भारत जगातील एक तृतियांश दुधाचे उत्पादन करेल. त्यामुळे भारताला आपली दूध उत्पादने जागतिक पातळीवर नेण्यासाठी ही एक मोठी संधी असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व्हिजन आहे की जगातील प्रत्येक जेवणाच्या टेबलवर भारताचा एक पदार्थ असावा, हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आणि आपली डेअरी उत्पादने जगभरात पोहोचवण्यासाठी ही एक मोठी संधी भारताला मिळाली आहे.