
9 ऑक्टोबर 2024 रोजी रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. रतन टाटा हे नाव प्रमाणेच अमूल्य रत्न होते. टाटा हे नाव उद्योगजगतातच गाजतय असं नाही. तर ते लाखो भारतीयांसाठी प्रेरणा आहे. अनेक तरुण, उद्योजक त्यांच्या मार्गदर्शनावर आजही चालतात. त्यांच्या आयुष्यात निराशेची वेळ आली तेव्हा त्यांना टाटांचे विचार प्रेरणा देतात. रतन टाटा देशासाठी अनेकदा धावून आले आहेत. त्यांनी टाटा समूहाला नवीन उंचीवर नेले. त्यांचा साधेपणा, करारी बाणा आणि टाटा समूह, देशासाठीचे कार्य आजही आठवल्या जाते. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे अनेकांना संकटात मार्ग सापडतो. त्यांचे एक असेच वाक्य सध्या व्हायरल होत आहे.
बंदुकीचे ते वाक्य
“जर एखाद्याने तुमच्या डोक्यावर बंदूक ठेवली तर दोनच पर्याय आहे. एक तर ट्रिगर दाबायला सांगा अथवा बंदूक बाजूला हटवा. कारण दोन्ही परिस्थितीत मी कधीच डोकं नमवणार नाही. खाली झुकवणार नाही.” असे त्यांचे प्रसिद्ध वाक्य आहे. याचा अर्थ परिस्थिती कशी का असेना पण तुम्ही तुमच्या आदर्शांवर अढळ राहा. तत्वांपेक्षा मोठे काहीही नसते, असा संदेश त्यांनी यातून दिला आहे.
त्यांची ही वाक्य सुद्धा अत्यंत प्रसिद्ध
आपल्या सर्वांकडे समान संधी आहे, त्यातून उजळून निघा
निष्पक्ष राहा, जी गोष्ट योग्य वाटते, तिच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा
नकलबाज काही काळासाठी पुढे राहतील, पण यशस्वी होत नाहीत
तुम्ही मशीन नाहीत तर मनुष्य आहात, आयुष्य जगणे शिका
खूप पुढे जायचे असेल तर सर्वांसोबत जा, एकटे जायचे असेल तर भराभर चाला
यशस्वी होण्यासाठी तुमचे गुण अगोदर हेरा
‘द आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन’ पुस्तकावर फिदा
‘द आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन’ हे पुस्तक रतन टाटा यांचे अत्यंत आवडीचे होते. मी पाचवेळा हे पुस्तक वाचलं. माझे डोळे पाणावले असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. लहानपणी मुंबईतील कॅपियन आणि कॅथेड्रल या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिकेत पोहचले. शाळेत असताना ते पियानो वाजवायला आणि क्रिकेट खेळायला शिकले. त्यांना इतरांच्या यशोगाथा वाचण्याचा पण छंद होता. अशी अनेक पुस्तकं त्यांनी संग्रही ठेवली होती.
मी उद्योगपती, व्यापारी नाही
रतन टाटा यांचे निकटवर्तीय वल्लभ भंसाली यांनी त्यांची एक आठवण सांगितली होती की, रतन टाटा हे नेहमी दूरचा विचार करत होते. छोट्या छोट्या नफ्याकडे लक्ष न देता काही तरी धोरण आखून त्यावर काम करत असत. आम्ही उद्योगपती आहोत, व्यापारी नाही. आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील, जे येत्या काही वर्षात देश आणि समाजाला मोठा लाभ पोहचवतील. त्यांना लाभ होईल. आपल्याला व्यापाऱ्याप्रमाणे छोट्या-मोठ्या लाभाकडे लक्ष्य देण्याची गरज नाही, असे टाटा म्हणाल्याची आठवण त्यांनी जागवली होती.