Success Story: काय सांगता केवळ पान विकून 7 कोटींचा व्यवसाय उभारला; आज कंपनीने 400 हून अधिक दुकानं उघडली
पी.एन. ठाकूर यांनी रस्त्याच्या कडेला विकल्या जाणाऱ्या पान व्यवसायाला एक नवीन ओळख दिली. त्यांनी 'मस्त बनारसी पान' या नावाने 2 लाख रुपयांमध्ये हा व्यवसाय सुरू केला आणि आज या व्यवसायाच्या जोरावर आता कोटींचे साम्राज्य उभारले आहे.

एके काळी रस्त्यांवरील आणि कोपऱ्यावरील दुकानांपुरते मर्यादित असलेले पान आता कॅफे संस्कृतीचा एक भाग बनले आहे. पारंपरिक दुकानांच्या पलीकडे जाऊन, हा व्यवसाय आता आधुनिक आउटलेट्स आणि ब्रँडेड अनुभवासह एक नवीन ओळख निर्माण करत आहे. या परिवर्तनामागे पी. एन. ठाकूर हे एक नाव आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या पी. एन. ठाकूर यांना पानांच्या असंघटित क्षेत्रात एक मोठी संधी दिसली. लहानपणापासूनच त्यांनी पानांची दुकाने जवळून पाहिली होती, पण त्यांच्यात स्वच्छतेचा आणि ब्रँड मूल्याचा अभाव होता. त्यांच्या एमबीएच्या अभ्यासाने आणि कामाच्या अनुभवाने त्यांची खात्री पटली की योग्य रणनीतीने एका साध्या उत्पादनाचे मोठ्या व्यवसायात रूपांतर करता येते. ठाकूर यांनी 2016 मध्ये 2 लाख रुपयांमध्ये ‘मस्त बनारसी पान’ सुरू केले. त्यांच्या पत्नी, माया कुमारी यांनी नोकरी सोडून आपली बचत या व्यवसायात गुंतवली. मर्यादित संसाधने असूनही, त्या दोघांनी आत्मविश्वासाने आणि कठोर परिश्रमाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आज हा व्यवसाय 7 कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. ठाकूर यांनी कोणत्याही बाह्य निधीशिवाय ही कामगिरी केली आहे. त्यांनी एका असंघटित क्षेत्राचे ब्रँडेड व्यवसायात रूपांतर केले आहे.
पी. एन. ठाकूर सांगतात की, “मी एका शेतकरी कुटुंबातील आहे. माझ्या कुटुंबात व्यवसायाचे वातावरण नव्हते; तिथे फक्त नोकरी आणि शेती हेच चालत असे. मी बनारस हिंदू विद्यापीठातून (बीएचयू) एमबीए केले. त्यानंतर मी काही काळ नोकरी केली, पण मला त्यात रस वाटत नव्हता आणि काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. यामुळेच मी नोकरी सोडून पानाचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. मी वडिलांना नोकरी सोडून पानाचा व्यवसाय सुरू करणार असल्याचे सांगितल्याबरोबरच त्यांची प्रकृती खालावली. पानाच्या व्यवसायात उतरण्यासाठी मला खूप धाडस लागले. माझ्या पत्नीने आपल्या बचतीतील काही रक्कम देऊन आणि नोकरी सोडून माझ्या व्यवसायाला हातभार लावला. मग आम्ही ‘मस्त बनारसी पान’ हा व्यवसाय सुरू केला.”
पी.एन. ठाकूर पुढे सांगतात की, “आम्ही आमचा पहिला पानाचा व्यवसाय उत्तर प्रदेशातील मोरादाबाद येथे सुरू केला. केवळ एका वर्षात सुरुवातीची गुंतवणूक वसूल केली. आज, ‘मस्त बनारसी पान’ या ब्रँडअंतर्गत कंपनी 70-80 प्रकारचे पान विकते. या सर्व पानांमध्ये तंबाखू नसतो, म्हणजेच ते तंबाखूमुक्त असतात. कंपनी चॉकलेट पान, मँगो पान, ड्राय फ्रूट पान, सिल्व्हर पान, गोल्ड पान आणि आईस्क्रीम पान यांसारख्या विविध नावांनीही पान तयार करते. ग्राहकांच्या सोयीनुसार पान दिले जाते.”
कंपनी आपल्या आउटलेट्समध्ये कौटुंबिक वातावरण प्रदान करते. ठाकूर म्हणतात की, “पान खाण्याच्या विचाराने अनेकदा लोकांच्या मनात नकारात्मक विचार येतात. या नकारात्मक धारणेला तोंड देण्यासाठी ‘मस्त बनारसी पान’ सुरू करण्यात आले. केवळ कलियुगापासूनच नव्हे, तर सत्ययुग आणि त्रेतायुगापासूनही पानाचे सेवन केले जात आहे. पानामध्ये आरोग्यदायी घटक मिसळले जातात. आज कंपनीची 400 हून अधिक दुकाने आहेत. मोहाली, बंगळूर, दिल्ली, पुणे, विजयवाडा, मथुरा, जालंधर, श्रीनगर, जयपूर, रांची, जमशेदपूर, पाटणा, वडोदरा आणि हैदराबाद यांसह भारतातील 300 हून अधिक शहरांमध्ये तिचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे.