Minatai Thackeray: मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणी पहिली अटक, धक्कादायक कनेक्शन समोर?

मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज पहाटे रंग फेकण्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Minatai Thackeray: मीनाताई ठाकरे पुतळा प्रकरणी पहिली अटक, धक्कादायक कनेक्शन समोर?
Minatai Thackeray
| Updated on: Sep 17, 2025 | 10:19 PM

मुंबईतील शिवाजी पार्क येथील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर आज पहाटे रंग फेकण्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे हा व्यक्ती ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. उपेंद्र गुणाजी पावसकर असं आरोपीचे नाव असल्याचेही समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मीनाताई ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोत्री आहेत. त्यामुळे शिवसैनिक त्यांना आदराने माँ साहेब म्हणतात. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. आता या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने गुन्हा कबूल केला असल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप पावसकर याने केला आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘आजचा प्रकार अत्यंत निंदनीय होता. ज्याला स्वत:च्या आई-वडिलांची नाव घ्यायला शरम वाटते, त्याने हे केलं असावं. महाराष्ट्र पेटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो. पोलीस या सगळ्या गोष्टीचा शोध घेत आहेत. बघू पुढे काय होतं. पोलीस म्हणतात की, आम्ही शोधून काढू. दोन प्रकारच्या व्यक्ती यामागे असू शकतात, ज्यांना स्वत:च्या आई-वडिलांच नाव घ्यायला लाज वाटते, शरम वाटते अशा लावारिस व्यक्तीने हे केलं असावं.’

ही घटना निषेधार्य – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्यात आल्याच्या प्रकरणावर प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अशाप्रकारची घटना ही निषेधार्य आहे. ज्या कुठल्या समाज कंटकांनी हे कृत्य केलं आहे, त्याला पोलिस शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील. यापेक्षा जास्त याला राजकीय रंग देणं मला योग्य वाटत नाही.’