दिल्ली : पेपर कठिण गेला म्हणून आई-वडील रागावतील या भीतीने मुलीने जे केले त्यानंतर पालकच नाही तर पोलीसही चक्रावून गेले. दिल्लीतील भजनपुरा भागात दहावीची विद्यार्थिनी बोर्डाचा पेपर देण्यासाठी गेली होती. शाळेतून परतली तेव्हा तिच्या अंगावरचे कपडे फाटले होते. तसेच रक्तबंबाळ अवस्थेत होती. यानंतर पालकांनी पोलिसात धाव घेत मुलीचे अपहरण करून विनयभंग केल्याची तक्रार केली. मात्र तपासानंतर जे उघडकीस आले त्यानंतर पोलीसही हैराण झाले.
मुलीची दहावीची परिक्षा सुरु आहे. मुलीचा 15 मार्च रोजी “सोशल स्टडीज”चा पेपर होता. पण हा पेपर मुलीला कठिण गेला. पेपरमध्ये कमी गुण मिळाले तर आई-वडिल रागावतील या भीतीने मुलीने पालकांचा ओरडा टाळण्यासाठी एक योजना आखली. तिने स्वतःच स्वतःला इजा करुन घेतली. मग अपहरणाची कहाणी रचली.
घरी आल्यानंतर तिने पालकांना सांगितले की, ती शाळेतून परतत असताना तिला दोन-तीन अनोळखी मुलांनी अडवले. ते तिला कुठेतरी घेऊन गेले. तिचा विनयभंग केला आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. तिच्या वैद्यकीय तपासणीबरोबरच DCW च्या सदस्याकडून तिचे समुपदेशनही करण्यात आले.
याप्रकरणी भजनपुरा पोलीस ठाण्यात अपहरण, शारीरिक शोषण आणि विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला. मुलीच्या जबानीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान, पीडितेने सांगितलेल्या घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलीने सांगितलेला कोणताही प्रकार घडलेला दिसला नाही.
जेव्हा पोलिसांनी मुलीचे समुपदेशन केले तेव्हा मुलीने सत्य उघड केले. मुलीने सांगितले की, तिची दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू आहे आणि तिला “सोशल स्टडीज” मध्ये चांगले यश मिळवता आले नाही. त्यामुळे पालक नाराज होतील या भीतीने तिने स्वत:ला इजा केली आणि अपहरणाचा बनाव पालकांकडे रचला.