पोलिसांच्या तावडीतून मालकाने सोडवलं, वॉचमनचा बायकोसोबत त्याच्याच घरी 47 लाखांचा दरोडा

| Updated on: Nov 22, 2021 | 10:48 AM

लग्न सोहळ्याला उपस्थित राहून श्रीधर जेव्हा घरी परत आले, तेव्हा बेडरुमच्या दरवाजाचे कुलूप तोडण्यात आले होते. रोख रक्कम आणि सोने चोरीला गेल्याचे त्यांना समजले. कृष्णा आणि जानकी हे दोघेही त्यांच्या घरातून पळून गेल्याचे त्यांनी पाहिले

पोलिसांच्या तावडीतून मालकाने सोडवलं, वॉचमनचा बायकोसोबत त्याच्याच घरी 47 लाखांचा दरोडा
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

बंगळुरु : सुरक्षा रक्षक आणि त्याच्या पत्नीने अकाउण्टंटच्या घरी दरोडा घातल्याचा प्रकार कर्नाटकात उघडकीस आला आहे. पूर्व बंगळुरुतील कामनाहल्ली भागात राहणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीकडे ते घरगुती मदतनीस म्हणून काम करत होते. 15 नोव्हेंबर रोजी घरात घुसून त्यांनी 47 लाख रुपये रोख आणि 7 लाख रुपये किमतीच्या 170 ग्रॅम सोन्यावर डल्ला मारला.

अकाउण्टंट श्रीधर यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की कृष्णा आणि जानकी जवळपास दोन महिन्यांपासून त्यांच्या घरी काम करत होते. घराच्या आवारातच दोघांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती.

काय आहे प्रकरण?

तक्रारदार श्रीधर हे पॅलेस ग्राऊंडवर एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घरातून निघाले, तर त्यांची पत्नी आणि मुले देखील एका साखरपुडा समारंभासाठी व्हाईटफिल्ड भागात गेली होती. यावेळी कृष्णाची पत्नी जानकी घरी काम करत होती, त्यांनी श्रीधर यांच्या पत्नीला काही कामे उरली असल्याने दरवाजाला कुलूप न लावण्याची विनंती केली.

रोख रक्कम आणि सोने चोरीला

लग्न सोहळ्याला उपस्थित राहून श्रीधर जेव्हा घरी परत आले, तेव्हा बेडरुमच्या दरवाजाचे कुलूप तोडण्यात आले होते. रोख रक्कम आणि सोने चोरीला गेल्याचे त्यांना समजले. कृष्णा आणि जानकी हे दोघेही त्यांच्या घरातून पळून गेल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर 15 नोव्हेंबर रोजी गंगामनागुडी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

मालकाकडूनच सुटका

विशेष म्हणजे यापूर्वी, पोलिसांनी श्रीधर यांना सावध राहण्यास सांगितले आहे. कृष्णाला चोरी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यावेळी श्रीधर यांनीच आपला सुरक्षा रक्षक निर्दोष असल्याचं सांगत त्याची पोलीस कोठडीतून सुटका केली होती. मात्र पोलिसांच्या इशाऱ्यानंतरही, श्रीधरने कानाडोळा केला. पोलीस पथकाने श्रीधर यांना दुसरा सुरक्षा रक्षक नेमण्यासही सुचवलं होतं.

“श्रीधर यांनी आमच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले, पैसे आणि मौल्यवान वस्तू गमावल्या,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. संशयितांना पकडण्यासाठी बनासवाडी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत.

संबंधित बातम्या :

अमरत्वाचा सोस, पत्नीने पतीला घरामागे जिवंत गाडले, दोन दिवसांनी मुलीला आढळला मृतदेह

एकविरेच्या दर्शनाहून परतताना भीषण अपघात, तिघा भाविकांचा मृत्यू, चिमुकल्यांसह 9 जण गंभीर

आधी मुलांना पाणी पाजले, मग एक एक करुन विहिरीत फेकले, नंतर आईचीही उडी घेत आत्महत्या