मोठी बातमी ! राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयचे समन्स

| Updated on: Sep 30, 2021 | 10:26 PM

राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती सीबीआयच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.

मोठी बातमी ! राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयचे समन्स
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे
Follow us on

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती सीबीआयच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. सीबीआयकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. पण सीबीआयकडून थोड्याच वेळात कुंटे आणि पांडे यांना कधी आणि किती वाजेपर्यंत चौकशीसाठी सामोरे राहायचं, याबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यानंतर त्याबाबतची सविस्तर माहिती समोर येईलच.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसूली प्रकरणी सीबीआयची चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे ईडीकडून देखील या प्रकरणी चौकशी सुरु आहे. सीबीआयने या प्रकरणी चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्याच तपासाचा एक भाग म्हणून आता सीताराम कुंटे आणि संजय पांडे यांचा जबाब नोंदविला जाणार आहे.

दोन्ही अधिकाऱ्यांचा सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने अनिल देशमुख प्रकरणात साक्षीसाठी दोघांना समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे. पण संजय पांडे आणि सीताराम कुंटे यांनी सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिला आहे. यापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या अधिकाऱ्यांनी सीबीआयसोबत चर्चा केली होती. त्यामुळे सीबीआयला जबाब नोंदवायचा असल्यास कार्यालयात येण्याची विनंती दोन्ही अधिकाऱ्यांनी केली आहे.

समन्स पाठवले म्हणजे गुन्हेगार ठरत नाही, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया

या समन्सवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोघांनीही सीबीआयला सगळ्यांचा पैलूंचा विचार करुन अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटी घोटाळा प्रकरणाचा तपास करायला सांगितलं आहे. त्या तपासात मनी लॉन्ड्रिंग, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, 100 कोटी वसूली तसेच फोन टॅपिंग प्रकरण हे सगळे प्रकरण येणार. या तपासादरम्यान वेगवेगळ्या खात्याशी संबंधित सर्वांनी सहकार्य करुन माहिती द्यावी. चौकशीसाठी बोलावलं किंवा समन्स बजावला याचा अर्थ ती व्यक्ती गुन्हेगार असते असं ठरत नाही. संबंधित व्यक्तीकडे जी माहिती आहे ती द्यावी लागते. याच चौकशीतून महत्त्वाची माहिती मिळते ज्यातून तपास यंत्रणा योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकते”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

नेमकं प्रकरण काय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.

संबंधित बातम्या :

Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील आरोपांचा ईडी तपास सुरु, ECIR दाखल

ईडीचा पुन्हा दणका; अनिल देशमुखांशी संबंधित तीन ठिकाणांवर धाडी!