तो इंजिनियर, ती शिक्षिका, लग्न केलं, सुहागरात मग 15 दिवसानंतर दुसरी सोबत…प्रेमावरचा विश्वास उडेल अशी घटना
ही बातमी वाचून तुमचा प्रेमावरचा विश्वास उडेल. ती दीपकच्या मावशीची मुलगी. 13 वर्ष त्यांच्यात प्रेमसंबंध होते. पण लग्नानंतर 15 दिवसही हे नातं टिकू शकलं नाही. का? काय झालं? जाणून घ्या.

दीपक आणि आराध्याचं नातं बालपणापासून सुरु झालं. दोघे एकाच गावात रहायचे. सुट्टीमध्ये भेटायचे. हळूहळू मैत्री प्रेमात बदलली. दीपक डिप्लोमा इंजिनियर होता. आराध्या शाळेत शिक्षिका होती. नात्यात आराध्या दीपकच्या मावशीची मुलगी होती. दोघांनी पळून जाऊन लग्न केलं. 13 वर्षाचं हे प्रेम 15 दिवसही टिकलं नाही. लग्नानंतर दोघांचा मधुचंद्र झाला. त्यानंतर 15 दिवसात दीपकने आराध्याची हत्या केली. बिहारच्या छपरा जिल्ह्यातील ही घटना एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी आहे. धक्कादायक म्हणजे ज्या इतक्या वर्षाच्या प्रेमावर विश्वास ठेऊन आराध्या घरातून पळून आली, त्या दीपकने पोलिसांसमोर दिलेली कबुली धक्कादायक आहे. “ती माझ्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त हस्तक्षेप करत होती. माझे कुटुंबिय समाजाचा हवाला देऊन माझं लग्न दुसरीकडे लावत होते. मला तिला मारायचं नव्हतं. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की मी तिचा गळा आवळला” असं दीपक पोलिसांसमोर कबुली देताना म्हणाला. पण त्याला आपल्या कृत्याचा कुठलाही पश्चाताप नाहीय.
2022 मध्ये आराध्याच्या नातेवाईकांनी तिचं लग्न दुसरीकडे ठरवलेलं. पण तिने बंडखोरी केली. तिने स्पष्ट शब्दात सांगितलं की, मी दीपकवर प्रेम करते. कुटुंबियांना हे मान्य नव्हतं. आराध्याने आपलं घर सोडलं. छपरामध्ये ती भाड्याच्या घरात राहत होती. दीपक आणि ती तीन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. दीपकच्या कुटुंबियांनी त्याच्यावर दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी दबाव टाकला. त्यावेळी आराध्याने आक्षेप घेतला. जवळपास एक महिना टाळाटाळ केल्यानंतर दीपकने 13 मार्चला छपरा येथे एका मंदिरात गुप्तपणे आराध्याशी लग्न केलं. फक्त जवळचे मित्र या लग्नाला हजर होते.
आराध्या सतत त्याला फोन करायची
लग्नाच्या 15 दिवसानंतर दीपकचा दुहेरी चेहरा समोर आला. एकीकडे तो आराध्याचा नवरा असल्याचं कर्तव्य बजावत होता. दुसरीकडे वडिलांच्या इच्छेनुसार दुसऱ्या मुलीसोबत लग्नाची तयारी करत होता. आराध्याला या बद्दल समजल्यानंतर तिने विरोध सुरु केला. आराध्या सतत त्याला फोन करायची. त्याला लोकेशन विचारायची. त्याच्यावर ती नजर ठेऊ लागली होती. याला दीपक कंटाळलेला. 13 एप्रिलला आराध्या गाढ झोपेत असताना दीपकने तिची गळा आवळून हत्या केली. तिचा मृतदेह गोणीत भरला व सीवानच्या सीमेवर फेकून दिला.
दुसऱ्या लग्नाचा दिवस
21 एप्रिलला दीपकच्या दुसऱ्या लग्नाचा दिवस होता. आराध्याच्या वडिलांना संशय आला. ते भाड्याच्या घरी पोहोचले. घर बंद होतं. 23 एप्रिलला पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी कठोरतेने चौकशी केल्यानंतर दीपकने गुन्ह्याची कबुली दिली.
