आंघोळीनंतर नदीकिनारी बसलेल्या तिघांवर काळ कोसळला, विजेची तार पडून जागीच गतप्राण

| Updated on: Feb 02, 2022 | 9:34 AM

नदीकिनारी असलेल्या चबुतऱ्यापासून अवघ्या पाच मीटर उंचीवरून विजेची तार जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तारेची उंची वाढवण्याची मागणी अनेक वेळा करुनही विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे.

आंघोळीनंतर नदीकिनारी बसलेल्या तिघांवर काळ कोसळला, विजेची तार पडून जागीच गतप्राण
प्रातिनीधिक छायाचित्र
Follow us on

रांची : नदीत आंघोळ केल्यानंतर कठड्यावर बसून उन्हं अंगावर घेणाऱ्या तिघा जणांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. नदी किनारी बसलेल्या ग्रामस्थांच्या अंगावर हाय टेंशन विजेची तार (High tension line) पडल्यामुळे तिघांना जागीच प्राण गमवावे लागले, तिघे जण जखमी झाले आहेत, तर काही जण यातून बालंबाल बचावले. झारखंडमधील (Jharkhand) पलामू जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला. जखमींमध्ये साठीच्या वरील तिघा जणांचा समावेश असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विजेचा तीव्र झटका बसून तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर परिसरात एकच आक्रोश पसरला. विद्युत विभागाच्या हलगर्जीविरोधात ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी रास्ता रोको करुन वीज विभागाच्या विरोधात घोषणाबाजी केली. अखेर वीज विभाग अधिकाऱ्यांनी हे प्रकरण कसेबसे शांत केले.

तिघांचा जागीच मृत्यू

55 वर्षीय सुरेश चौधरी, 42 वर्षीय बुटन चौधरी, 24 वर्षीय कुशवर चौधरी अशी मृतांची नावं असून सर्व लेहार बंजारी गावातील नवाडीह टोला येथील रहिवासी आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी चित्कार उमटले होते. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांनाही उपचारासाठी गढवा येथील मझिगांवमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये 65 वर्षीय लखन चौधरी, 62 वर्षीय रामसुंदर चौधरी आणि 63 वर्षीय रामकेश्वर चौधरी यांचा समावेश आहे.

वीज पुरवठा बंद होईपर्यंत तिघे गतप्राण

या घटनेची माहिती मोहम्मदगंज वीज उपकेंद्राला देण्यात आली, मात्र वीजपुरवठा बंद होईपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला होता. माहिती मिळताच उंटारी, पांडू, रेहला पोलिस घटनास्थळी पोहोचले. सर्कल इन्स्पेक्टर राजबल्लभ पासवान यांनी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र पीडित कुटुंब आणि ग्रामस्थ नुकसान भरपाईच्या मागणीवर ठाम राहिले. अखेर समजूत काढल्यानंतर प्रकरण शांत झाले.

ग्रामस्थांचा रास्ता रोको

या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मझिगांव पुलाजवळ उंटारी-मझिगांव रस्ता रोखून धरला. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वीज विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आल्यावर नुकसान भरपाई देण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. लोकांनी टायर जाळून जोरदार घोषणाबाजी केली.

नदीकिनारी असलेल्या चबुतऱ्यापासून अवघ्या पाच मीटर उंचीवरून विजेची तार जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तारेची उंची वाढवण्याची मागणी अनेक वेळा करुनही विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

वायर जोडण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिक खांबावर चढवलं, विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

पतंगाच्या मागे धावला नि होत्याचे नव्हते झाले; नागपुरात विजेच्या धक्क्याने गमावला जीव! 

आई-बहिणीनंतर एकुलत्या एक मुलाचेही प्राण गेले, बीडमधलं मुंगुसवाडा गाव सुन्न!