May I help you ? बनावट कॉल सेंटरद्वारे शेकडोंना लावला चुना, कोट्यवधी रुपये लुटून जगायचे आलिशान जीवन; तिघांना अटक

| Updated on: Oct 09, 2023 | 1:44 PM

सायबर गुन्हे करणाऱ्या टोळीतील 3 गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून महागडे मोबाईल, गाड्या, लॅपटॉप, सिम आणि इतर गॅझेट्स जप्त करण्यात आले आहेत. फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून ते छानछौकी करत, आलिशान आयुष्य जगायचे.

May I help you ? बनावट कॉल सेंटरद्वारे शेकडोंना लावला चुना, कोट्यवधी रुपये लुटून जगायचे आलिशान जीवन; तिघांना अटक
Follow us on

रांची | 9 ऑक्टोबर 2023 : आजकाल सायबर क्राईमचे प्रकार खूप वाढले आहेत. ऑनलाइन फसवणूक करून लोकांना लुबाडणाऱ्या अनेक टोळ्या सध्या कार्यरत आहेत. गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष किंवा झपट पैसा कमावण्याची लालूच दाखवत सामान्य लोकांना भुलवले जाते आणि तेही या आमिषांना बळी पडतात. जामतारा पोलिसांनी एका अशा सायबर गँगचा (cyber fraud) पर्दाफाश केला आहे, ज्यांच्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला धक्काच बसेल. सायबर गँगच्या तीन अतिहुशार, चलाख गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. सायबर गँगच्या या सराईत गुन्हेगारांनी लोकांची फसवणूक करण्याची अनोखी पद्धत अवलंबली होती.

या गुन्हेगारांनी घरच्या घरी बनावट कॉल सेंटर चालवून शेकडो लोकांना दगा देऊन त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली. या फसवणुकीतून मिळालेल्या पैशांतून ते ऐशो-आरामात जगायचे, आलिशान आयुष्य उपभोगायचे, अशी माहिती समोर आली आहे. झारखंडमधील जामतारा जिल्हा सध्या सायबर गुन्ह्यांचे आगार म्हणून ओळखला जात आहे. जिल्ह्यात अनेक लोक दररोज सायबर फसवणुकीला बळी पडत आहेत.

पोलिसांनी एका सायबर टोळीचा पर्दाफाश केला आहे. हे सायबर गुन्हेगार बनावट कॉल सेंटर तयार करून लोकांना फसवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, असे जिल्हा एसपी अनिमेश यांनी सांगितले. गुन्हेगारांना पकडण्यासाठी सायबर पोलिस स्टेशनच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. तपासादरम्यान जामतारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमवाड गावात अन्वर अन्सारीच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांना त्याच्या घरात बनावट कॉल सेंटर सुरू असल्याचे आढळून आले. घटनास्थळावरून अन्वरसह तीन सायबर गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली.

अवघ्या काही मिनिटांत बँक अकाऊंट व्हायचं रिकामं

पोलिसांनी अटक केलेले तीन सायबर गुन्हेगार हे अत्यंत हुशार आणि चलाख आहेत. अनोख्या पद्धतींचा वापर करून ते लोकांची फसवणूक करत होते. त्यांच्या घरी बनावट कॉल सेंटर चालवले जात होते. गुगलवरून कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा नंबर शोधायचा, त्यानंतर बँक अधिकारी बनून ते खातेधारकांना केवायसी, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्डच्या बहाण्याने फोन करायचे. एक यूआरएल लिंक पाठवून ते लोकांना जाळ्यात ओढायचे. त्यानंतर ते समोरील व्यक्तीला मोबाईलवर एक स्क्रीन शेअरिंग ॲप डाऊनलोड करण्यास सांगायचे. ते ॲप डाऊनलोड होता, समोरील ग्राहकाचा किंवा इसमाचा मोबाईल संपूर्णपणे या गुन्हेगारांच्या कंट्रोलमध्ये यायचा. त्यानंतर अवघ्या काही क्षणांत हे चलाख गुन्हेगार त्यांचं बँक अकाऊंट रिकामं करायचे.

तिघांना पोलिसांनी केली अटक

बनावट सेंटर उघडून सायबर फसवणूक करणाऱ्या तीन सायबर गुन्हेगारांना जामतारा पोलिसांनी अटक केली. अन्वर , मुनीर आणि सगीर यांना जामतारा जिल्ह्यातील सोमवद गावात छापा टाकून अटक करण्यात आली. बनावट कॉल सेंटर तयार करून सायबर फसवणूक केल्याचे या तिघांनीही कबूलही केले. पोलिसांनी त्यांच्यकडून 15 मोबाईल फोन, 21 सिमकार्ड, एक लॅपटॉप, दोन वायफाय डोंगल, तीन एटीएम कार्ड्स तसेच 5 बँक पासबूक आणि तीन कार जप्त केल्या आहेत.

100 हून अधिक लोकांची केली फसवणूक

या तीनही आरोपींनी आत्तापर्यंत सुमारे 100 हून अधिक लोकांना फसवून लुबाडले आहे, असे पोलिसांनी सांगितले. सायबर फ्रॉडद्वारे मिळालेल्या रकमेचा उपयोग करत त्यांनी आलिशान घर, महागड्या कार खरेदी केल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी कोटयवधी रुपयांची अफाट संपत्ती मिळवली असून, त्याबाबत जामतारा सायबर पोलीस स्टेशनचे अधिकारी अधिक तपास करत आहे. ते लाखो रुपये खर्च करून ऐशो-आरामात जगायचे. महागड्या हॉटेल्समध्ये जेवणे, ब्रँडेड कपडे घालणे आणि आलिशान गाड्यांमध्ये प्रवास करणे हे त्यांना आवडायचे, असेही पोलिसांनी नमूद केले.