
Minor Girl Forcibly Married : जळगावमध्ये 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्ती लग्न लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे आपल्या मुलीसोबत घडलेल्या या प्रकारानंतर न्याय मिळावा म्हणून पोलीस तक्रार देऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलीला विकून तिचे लग्न लावून दिल्यानंतर ती पाच महिन्यांची गर्भवती राहिल्याचाही गंभीर प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या हादरवून टाकणाऱ्या घटनेचा खुलासा झाल्यानंतर जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला रोजगाराच्या बहाण्याने नेण्यात आले. तिथे तिच्याजवळचे पैसे आणि दागिने घेऊन तिला विकण्यात आले. विकून तिचा जबरदस्तीने विवाह करण्यात आला. आपल्या अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या प्रकाराचा धक्का बसल्याने तसेच विकत घेऊन लग्न करणारे कोल्हापूर येथील आठ ते दहा जण जीवे मारण्याची धमकी देत असल्याने या त्रासाला कंटाळून मुलीच्या बापानेही आत्महत्या केली आहे. मुलीच्या बापाने आत्महत्या केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे.
आपल्या अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या प्रकाराचा धक्का बसल्याने तसेच विकत घेऊन लग्न करणारे कोल्हापूर येथील आठ ते दहा जण जीवे मारण्याची धमकी देत असल्याने त्रासाला कंटाळून मुलीच्या बापाने आत्महत्या केल्याची घटना आज घडली घडली आहे, या आत्महत्येच्या घटनेनंतरच हा प्रकार समोर आला आहे.
या प्रकाराबाबत तब्बल आठ दिवस उलटूनही रामानंद पोलीस तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी तक्रार घेत नसल्याने त्रासाला कंटाळून मुलीच्या बापाने गळफास घेतल्याचा धक्कादायक आरोप मयताचे भाऊ तसेच मुलाने केला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा कुटुंबियांनी घेतला आहे. अल्पवयीन मुलींना रोजगाराच्या निमित्ताने घेऊन जाऊन त्यांना विकणे, त्यांचे परस्पर लग्न लावणे याचे मोठे रॅकेट असून याचा सीबीआयच्या माध्यमातून तपास करण्याची मागणीसुद्धा नातेवाईकांनी केली आहे.
सतरा वर्षीय मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्यानंतर या काळात अल्पवयीन मुलगी पाच महिन्याची गर्भवती राहिल्याचेही समोर आले आहे. तिचा गर्भपातसुद्धा झाल्याची माहिती कुटुंबियांच्या वतीने देण्यात आली आहे. या प्रकाराला कंटाळून अल्पवयीन मुलगी घरी पळून आली. घरी आल्यानंतर तिने तिच्यासोबत घडलेली आपबीती कुटुंबीयांना कथन केली, हे ऐकून कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
दरम्यान, या प्रकरणाबाबत अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी तब्बल आठ दिवसांपासून तक्रार देऊनही रामानंदनगर पोलीस स्टेशन तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप केला आहे. मुलीला विकत घेणारे तसेच तिच्या सोबत लग्न करणारे कोल्हापुर येथील कुटुंब मुलीला परत पाठवा तसेच आमचे पैसे सुद्धा द्या अशाप्रकारची धमकी देत होते. तर दुसरीकडे याबाबत पोलीसही तक्रार घेत नसल्याने या सर्व गोष्टींना कंटाळूनच मुलीच्या बापाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.