आधी बोट कापलं, आता गळा कापू, ठाण्यात फेरीवाल्याची अतिक्रमणविरोधी कर्मचाऱ्याला धमकी

यापूर्वी कल्पिता पिंपळे या महिला अधिकाऱ्याची बोटे कापली होती. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने धास्ती घेतली असून भीती निर्माण झाली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

आधी बोट कापलं, आता गळा कापू, ठाण्यात फेरीवाल्याची अतिक्रमणविरोधी कर्मचाऱ्याला धमकी
Thane municipal corporation
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 22, 2021 | 11:23 AM

ठाणे : ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांची बोटं छाटण्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एकदा फेरीवाल्याने महापालिकेच्या अतिक्रमण हटाव कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या पातलीपाडा भागात असणाऱ्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर दोन दिवसांपूर्वी अतिक्रमण कारवाई करताना हा प्रकार घडला.

नेमकं काय घडलं?

आधी बोट कापलं, आता गळा कापू, असा शब्दात फेरीवाल्याने अतिक्रमण हटवणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. मात्र याबाबत कासारवडवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. फेरीवाला हा नारळ विक्रेता आहे. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या पातलीपाडा भागात असणाऱ्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर दोन दिवसांपूर्वी अतिक्रमण कारवाई करताना हा प्रकार घडला.

यापूर्वी कल्पिता पिंपळे या महिला अधिकाऱ्याची बोटे कापली होती. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याने धास्ती घेतली असून भीती निर्माण झाली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

कल्पिता पिंपळे यांची बोटं कापली

ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने अचानक हल्ला करण्यात आला. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केल्याने त्यांची दोन बोटेच तुटून पडली, तर बचावासाठी धावलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे. कल्पिता पिंपळे यांना ज्युपिटर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

राज ठाकरेंचा इशारा

“पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील, फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही, तेव्हा यांना कळेल, यांची हिंमत कशी होते? तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजेत. हे काय फक्त मुंबईत होत नाही. इतक्या वर्षात कुणाची हिंमत झाली नाही बोटं छाटायची. हे सहीसलामत बेलवर सुटणार. यांना भीती काय आहे हे पोलिसातून बाहेर आल्यावर कळेल.” असा इशारा राज ठाकरेंनी त्यावेळी दिला होता.

तुमच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होईल. ते आमच्यावर सोडा. त्याची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा, असा शब्दच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे पालिकेच्या अधिकारी कल्पिता पिंपळे यांना दिला होता.

संबंधित बातम्या :

राज ठाकरेंची पुन्हा परप्रांतीयविरोधी भूमिका? राज म्हणतात, बोटं छाटणारा बाहेर येऊ दे!

आरोपींना कडक शिक्षा होणार, काळजी करू नका, तुम्ही फक्त ठणठणीत बऱ्या व्हा; मुख्यमंत्र्यांचा कल्पिता पिंपळेंना शब्द

Follow Us