IND vs NZ : हिशोब करण्याची वेळ आलीय, टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वसूली करणार का?
India vs New Zealand T20i World Cup Head To Head : टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध इतिहास घडवण्यासह इतिहास बदलण्याची दुहेरी संधी आहे. जाणून घ्या टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत कामगिरी कशी राहिली आहे.

सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडिया आणि चाहते आयसीसी टी 20i वर्ल्ड कप चॅम्पियन होण्यासाठी सज्ज आहेत. टीम इंडियासमोर या स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान आहे. हा महामुकाबला नेहमीप्रमाणे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. न्यूझीलंडने दक्षिण गेल्या पर्वातील उपविजेत्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभूत करुन अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर गतविजेत्या भारतीय संघाने इंग्लंडवर 7 धावांनी मात करत सलग दुसऱ्यांदा आणि एकूण चौथ्यांदा फायनलचं तिकीट मिळवलं आहे. आता टीम इंडियाला अंतिम सामन्यात विजय मिळवून न्यूझीलंडचे अनेक हिशोब चुकत करुन इतिहास घडवण्याची संधी आहे.
आतापर्यंत कोणत्याच संघाला 3 टी 20i वर्ल्ड कप जिंकता आलेले नाहीत. मात्र टीम इंडियाकडे ही संधी आहे. तसेच उभयसंघातील टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील आकडेवारी पाहता न्यूझीलंड भारतावर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं. टीम इंडियाने टी 20i क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळलेल्यापैकी बहुतांश सामन्यात विजय मिळवला आहे. मात्र टीम इंडिया न्यूझीलंडसमोर टी 20i वर्ल्ड कपमध्ये ढेर ठरली आहे. त्यामुळे टीम इंडियाकडे आता किवींचा हिशोब चुकता करुन पुन्हा एकदा वर्ल्ड चॅम्पियन म्हणून ठसा उमटवण्याची दुहेरी संधी आहे.
0-3, टी 20i वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड सरस
अंतिम सामन्यानिमित्ताने टीम इंडिया आणि न्यूझीलंड दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही चौथी वेळ असणार आहे. न्यूझीलंडने याआधीच्या तिन्ही सामन्यात भारतावर विजय मिळवला आहे.
टीम इंडियाकडे किवींचा हिशोब करण्याची संधी
न्यूझीलंडने टीम इंडियावर या 3 पैकी 2 सामन्यांत धावांनी मात केली आहे. तर किवींनी एकदा यशस्वीरित्या विजयी धावांचा पाठलाग करुन सलग तिसरा सामना जिंकण्याची किमया साधली आहे. आता टीम इंडिया चौथ्या प्रयत्नात न्यूझीलंडचा धुव्वा उडवत गेल्या 3 पराभवांची परतफेड करुन तिसऱ्यांदा वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरण्यात यशस्वी होते का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
टीम इंडियाला सर्वाधिक अनुभव
दरम्यान टीम इंडियाला टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचा सर्वाधिक अनुभव आहे. टीम इंडियाची अंतिम फेरीत खेळण्याची ही चौथी वेळ असणार आहे. तर न्यूझीलंडची ही दुसरी वेळ असणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात खेळण्याबाबत टीम इंडिया वरचढ असल्याचं स्पष्ट होतं.
