UBT Shivsena: ही तर आमची माणसं… पण आमच्या काळजावर घाव… खासदार फुटीनंतर सुषमा अंधारे यांच्या डोळ्यात टचकन पाणी…
Shivsena Operation Tiger: ऑपरेशन टायगर अखेर फत्ते झाले. 6 खासदारांनी स्वतंत्र गटासाठी अर्ज केला. काल उद्धव सेनेचा व्हिप झुगारला, बैठकीला दांडी मारली. आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वीच ही घडामोड घडली आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

Sushma Andhare on Shivsena Operation Tiger: ऑपरेशन टायगरने उद्धव सेनेला खिंडार पडले. 9 पैकी 6 खासदारांनी बंड पुकारले. त्यांनी स्वतंत्र गट स्थापन्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज सादर केला. काल पक्षाचा व्हिप झुगारला. बैठकीला दांडी मारली. आज शिवसेनेचा 60 वा वर्धापन दिन आहे. त्यापूर्वीच ही मोठी घडामोड अनेकांच्या काळजाला बोचणी लावून गेली. यापूर्वी 2022 मध्ये शिवेसेनेत मोठी फूट पडली होती. त्यानंतर पक्ष सावरला आणि नव्या दमाने, नवीन चिन्हावर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उभा राहिला. 9 खासदार निवडून आले. आता त्यातील 6 जणांनी बंड पुकारले आहे. यावर बोलताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे भावनिक झाल्या. त्यांना अश्रू अनावर झाले.
ही तर आमची माणसं, पण…
उद्धव सेना फुटीवर सुषमा अंधारे यांनी मन मोकळं केले. परवा झालेल्या पत्रकार परिषदेतही त्यांनी या बंडाची विस्तृत माहिती दिली होती. या बंडाचे नेतृत्व वाशिम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांच्याकडे असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. तर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी कशी फसवणूक केली हे त्यांनी उदाहरण देऊन सांगितले. त्याचवेळी या खासदार फुटीवर त्या भावनिक झाल्या.
ओमराजे निंबाळकर, बंडू जाधव ही आमची माणसं होती. आमच्या काळजावर घाव झाला आहे. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. गेलेल्या लोकांना ऑफर दिली म्हणून ते गेले असतील.उद्या भाजपने मोठी ऑफर दिल्यावर काय करतील, अशी प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे भावनिक झाल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना भावना अनावर झाल्या.
पक्ष नेतृत्वाकडून काय अपेक्षा
यावेळी त्यांनी आजच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पक्ष नेतृत्व या फुटीवर, दुसऱ्यांदा असे घडले आहे, त्यावर बोलेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचवेळी त्यांनी पक्ष नेतृत्वाने मराठवाडा आणि विदर्भात यावे, सर्वांची भेट घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. संजय दिना पाटील निवडून यावे यासाठी त्यांनी सभा लावण्याची विनंती केली होती. आता केवळ घरात घुसण्याची भाषा केली तर त्यांनी घाबरून पोलीस बंदोबस्त लावून घेतला. ही कसली टायगर आहेत, ही पळपुटे लोक आहेत. त्यांनी बंडखोरांवर टीका केली. यावेळी सुषमा अंधारे यांना अश्रू अनावर झाले होते.
