सुट्टी नाकारल्यावरुन CRPF जवानाचा गोळीबार, वरिष्ठ अधिकारी शहीद, 29 वर्षांनी आरोपी सापडला

| Updated on: Aug 01, 2021 | 12:58 PM

शेत जमिनीतील हिस्सा मागण्यासाठी तो धनोडीला आता आला. याचा सुगावा लागताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सोबत असलेली रायफल त्याने त्रिपुरा येथील एका व्यक्तीला दिली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले

सुट्टी नाकारल्यावरुन CRPF जवानाचा गोळीबार, वरिष्ठ अधिकारी शहीद, 29 वर्षांनी आरोपी सापडला
वर्ध्यात २९ वर्षांनी आरोपी सापडला
Follow us on

वर्धा : सुट्टी नाकारल्याच्या कारणातून सीआरपीएफमध्ये शिपाई म्हणून कार्यरत जवानाने केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे गार्ड कमांडर लान्स नायक शहीद तर अन्य काही सहकारी जखमी झाले होते. या घटनेनंतर रायफलसह फरार असलेल्या सीआरपीएफच्या जवानाला तब्बल 29 वर्षांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. वर्ध्यातील आर्वीच्या पोलिसांनी ही कारवाई केली. या 29 वर्षांच्या काळात तो वेगवेगळ्या जिल्ह्यांत नाव बदलून राहत होता.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव सुभाष रामकृष्ण नाखले असं आहे. आर्वीच्या धनोडी बहाद्दरपूर इथे राहणारा सुभाष नाखले हा सीआरपीएफमध्ये कार्यरत होता. 1992 मध्ये त्रिपुरा इथे संत्री गार्ड म्हणून ड्युटीवर असताना सुट्टी नाकारल्याच्या कारणातून त्याने अंदाधुंद गोळीबार केला. त्यात गार्ड कमांडर लान्सनायक कजोरमल शहीद झाले होते. तसंच काही कर्मचारी जखमी झाले होते. घटनेनंतर सुभाषने तेथून रायफलसह पळ काढला होता.

नाव बदलून वास्तव्य

दरम्यानच्या काळात पोलिसांकडून त्याचा शोध सुरू झाला. पण सुभाष काही सापडत नव्हता. त्याने अशोक तुकाराम मोरे असं नाव बदलून घेतलं. त्याच नावाने तो इतरत्र राहू लागला. या नावाने तो गुजरात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये राहिला. इतकेच नव्हे तर मुंबई, भिवंडी, जळगाव, नाशिक जिल्ह्यातही तो नाव बदलून वास्तव्य करत होता.

पहिली पत्नी विभक्त

या काळात त्याने पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता दुसरा संसार थाटला. त्याला दुसऱ्या पत्नीपासून सहा मुली आणि दोन मुलं अशी अपत्ये असून ते सोबत राहत होते. मात्र, ही गोष्ट त्याच्या पहिल्या पत्नीला माहिती नव्हती. पतीशी पटत नसल्याने पहिली पत्नी त्याच्यापासून विभक्त राहत होती. पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी सध्या तामिळनाडू येथील एसआरपीएफ मध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे.

शेत जमिनीतील हिस्सा मागण्यासाठी आला आणि अडकला

एकदा जवान सुभाष रामकृष्ण नाखले हा 2012 मध्ये वडील रामकृष्ण यांची भेट घेण्यासाठी धनोडी गावात आला होता. केवळ दोन तास तो गावात राहिला होता. याची माहिती आर्वी पोलिसांना उशिरा मिळाली होती. तेव्हापासून आर्वी पोलिसांचे पथक आणि खबरे सुभाषच्या घरावर पाळत ठेवून होते. त्यानंतर शेत जमिनीतील हिस्सा मागण्यासाठी तो धनोडीला आता आला. याचा सुगावा लागताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सोबत असलेली रायफल त्याने त्रिपुरा येथील एका व्यक्तीला दिली असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आर्वी पोलिसांनी सीआरपीएफ बटालीयन आणि त्रिपुराच्या कंचनपुरा पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

गुन्ह्यानंतर तब्बल 29 वर्ष फरार राहिलेल्या आरोपीस ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळवलं. पोलिसांची ही कारवाई नक्कीच कौतुकाला पात्र ठरणारी आहे.

संबंधित बातम्या :

व्हिडीओ व्हायरल करुन पूर्णा नदीत उडी, अकोल्यातील युवकाच्या आत्महत्येचं गूढ उकललं

मुंबईत रेंज रोवर कारचा अपघात, भरधाव गाडी दुभाजकावर धडकली

(Wardha CRPF Jawan who killed Senior officer in firing found after 29 years)