सौभाग्याचं लेणं असुरक्षित, पोलिसांचं टेंशन पुन्हा वाढलं, तीन घटनांनी शहरात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर?
नाशिक शहरातील वेगवेगळ्या भागात महिलांच्या अंगावर सोने चोरट्यांनी ओरबाडून नेले आहे. लाखो रुपयांचे सोनं गेल्यानं महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरांमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांना ब्रेक लागला होता. त्यामुळे काहीसा महिला वर्गांमध्ये दिलासा मिळाला होता. नाशिक शहर पोलिसांना सोनसाखळी चोरीच्या घटनांवर आळा बसविण्यात यश मिळवलं होतं. मात्र, आता पुन्हा नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक शहर पोलिसांचं चोरांनी टेन्शन वाढवलं आहे. कुणाच्या गळ्यातील मंगळसूत्र तर कुणाच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोऱ्यांनी ओरबाडून नेल्याची घटना समोर आली आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला असला तरी अद्यापही चोरटे पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे शहरात उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.
पहिली घटना ही म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत वैदूवाडी येथे ममता प्रकाश काले या पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने 30 हजार रुपयांच्या किंमतीची सोन्याची चैन ओरबाडून नेली आहे. म्हसरूळ पोलिस ठाण्यात यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास केला जात आहे.
तर दुसऱ्या दोन्ही घटना या सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या असून यामध्ये शीतल सुरेश बच्छाव या मेनरोड परिसरात खरेदीसाठी आल्या असतांना पर्स मध्ये ठेवलेली 1 लाख साठ हजार रुपयांची सोन्याची चैन लंपास केली आहे. खरेदी करत असतांना गर्दीचा फायदा घेत ही चोरी झाली आहे.
तर तिसऱ्या घटनेत एका वृद्ध महिलेलेच्या हातातील सोन्याच्या बांगडया चोरट्यांनी ओरबडल्या आहेत. जवळपास साठ हजार रुपये किमितीच्या त्या सोन्याच्या बांगड्या होत्या. त्यात आज्जीचा नातू साहिल देवरे याने दिलेल्या तक्रारीवरुण सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकूणच पायी चालणे देखील महिलांच्या दृष्टीने सुरक्षित राहिलेले नाही. चोरटे अंगावरून सोन्याचे दागिने ओरबडत आहे. त्यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचे या घटनेवरुन टेंशन वाढलं असून चोरांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरू आहे.