अवैध धंदे चालकांना ग्रामीण पोलिसांचा दणका, नव्या पोलीस अधिक्षकांची कारवाई राज्यभर का ठरतेय चर्चेचा विषय…

नाशिकच्या ग्रामीण भागात दाखल झालेल्या गुन्ह्यात 619 गुन्हे अवैध दारूच्या संदर्भात आहे तर जुगाराचे 112 गुन्ह्याचा समावेश आहे, त्यामुळे फोफावलेली गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी ग्रामीण पोलिसांची मोहीम चर्चेचा विषय ठरत आहे.

अवैध धंदे चालकांना ग्रामीण पोलिसांचा दणका, नव्या पोलीस अधिक्षकांची कारवाई राज्यभर का ठरतेय चर्चेचा विषय...
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 12, 2022 | 11:58 AM

नाशिक : काही दिवसांपूर्वीच नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधिक्षक पदाच्या पदभार स्विकारलेल्या शहाजी उमप यांनी आत्तापर्यन्तची सर्वात मोठी कारवाई केली. अवघ्या चाळीस दिवसात 749 गुन्हे दाखल करून 852 आरोपींना गजाआड केले आहे. 87 लाखांचा मुद्देमाल यामध्ये हस्तगत करण्यात आला आहे. टोल फ्री नंबर जाहीर करून अवैध धंद्याची माहिती देणाऱ्याचे नावही गुपित ठेवले जात असल्याने या कारवाईची राज्यभर चर्चा आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात अवैध धंद्याचा समूळ नायनाट करण्यासाठी पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असले तरी दुसरीकडे नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत आहे. कमी दिवसांत मोठी कारवाई झाल्याने राज्यातील पोलीस दलात हा चर्चेचा विषय ठरत आहे. रात्री 10 नंतर ग्रामीण भागात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद होत असल्याने, पोलिसांची गस्तही वाढल्याने ग्रामीण भागात शिस्त लावण्याचे काम नव्याने होऊ लागले आहे.

शहाजी उमप यांनी पोलीस अधिक्षक पदाचा पदभार स्विकारताच नाशिक जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णतः बंद करण्यासाठी स्वतः मैदानात उतरून ही कारवाई सुरू केल्यानं अवैध धंदे चालकांचे धाबी दणाणले आहे.

40 दिवसांत 749 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये 852 अवैध धंदे चालकांना अटक करण्यात आली आहे. असून 87 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागात दाखल झालेल्या गुन्ह्यात 619 गुन्हे अवैध दारूच्या संदर्भात आहे तर जुगाराचे 112 गुन्ह्याचा समावेश आहे, त्यामुळे फोफावलेली गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी ग्रामीण पोलिसांची मोहीम चर्चेचा विषय ठरत आहे.

6262256363 या क्रमांकावर फोन करून अवैध धंद्याची माहिती दिल्यास त्यांचे नावही गुपित ठेवले जातं त्यामुळे तक्रारी करणाऱ्यांची संख्याही वाढू लागल्याने कारवाया वाढत आहे.

पोलीस अधिकारी बदलल्याने ह्या कारवाया वाढत गेल्या आहे, त्यामुळे अवैध धंदे यापूर्वी कशाच्या जोरावर सुरू होते, कुणाच्या वरदहस्ताने सुरू होते, स्थानिक पोलीस याकडे कशामुळे दुर्लक्ष करत होते ? असे विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Follow Us