
Odisha Girl Assult : आपल्या मित्रासोबत बिचवर फिरायला गेलेल्या एका 20 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं आहे. मित्रासोबत फिरत असताना तिच्यावर तब्बल 10 नराधमांनी पाशवी बलात्कार केला आहे. बलात्कार करण्याआधी या आरोपींनी तिच्या मित्राला मारहाण केली तसेच बांधून ठेवलं. या प्रकरणामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ओडिशा राज्यातील जंगम जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा गोपालपूर समुद्रतटावर ही धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (15 जून) रात्री तिच्यासोबत हे अमानुष कृत्य करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी ही महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिचं वय फक्त 20 वर्षे आहे. तिच्यावर एकूण दहा जणांनी बलात्कार केला आहे. यातील चार आरोपी हे अल्पवयीन आहेत. पोलिसांनी सर्व दहा आरोपींना अटक केली आहे. चांगली बाब म्हणजे यातील चार आरोपींना प्रौढ ग्राह्य धरून त्यांच्यावर खटला भरला जाणार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री साडे नऊ वाजता पीडित तरुणी आणि तिचा मित्र गोपालपूर बिचवर फिरायला एका निर्मणूष्य ठिकाणी गेले होते. हो देघेही वर्गमित्र असून एका खासगी कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. बिचवर फिरत असताना अचानकपणे तिथे तीन दुचाकींवर एकूण 10 जण आले. आरोपींनी अगोदर त्या दोघांचेही फोटो काढले आणि ते ऑनलाईन व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी पीडित तरुणीच्या मित्रावर हल्ला केला. त्याला दोरीने बांधले. त्यानंतर तरुणीला बंद पडलेल्या घरात नेऊन तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
ही घटना घडल्यानंतर पीडित तरुणी आणि तिचा मित्र थेट गोपालपूर पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली. घडलेल्या प्रकाराची दखल घेत पोलिसांनीही तत्काळ आरोपींना अटक केलं आहे.
या प्रकरण बर्हामपूरचे पोलीस अधीक्षक विवेक सरवाना यांनी सविस्तर माहिती दिली आहे. “तक्रार दाखल होताच आम्ही तत्काळ कारवाईला सुरुवात केली. सुरुवातीला सात संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर इतर तिघांनाही अटक करण्यात आली. अटक केलेले सर्व आरोपी हे गंजाम येथील हिंजिलिकट येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 70 (1) (सामूहिक बलात्कार), 296 (अश्लील कृत्य), 351(3) (गंभीर धमकी), आणि 310(2) (गुन्हेगारी संघटन) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे,” असे सरवाना यांनी सांगितलंय.
अल्पवयीनांना प्रौढ म्हणून ग्राह्य धरावं
दरम्यान, या प्रकरणी आरोपी असलेल्यांपैकी एकूण चार जण आरोपी आहेत. त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आलं. या आरोपींना प्रौढ म्हणून ग्राह्य धरावं आणि त्यांच्याविरोधात खटला उभा करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पोलिसांनी बाल न्याय मंडळासमोर केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.