पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांची फसवणूक, धाराशिव पोलिसांकडून आरोपींचा पर्दाफाश
पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील पैशांबाबत शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची घटना धाराशिव येथे उघडकीस आली आहे. अखेर पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश केला आहे.
धाराशिव / संतोष जाधव : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन टोळीचा धाराशिव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हा नोंद करुन एका आरोपीला अटक केली आहे. अजय चौरे असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्या बीड जिल्ह्यातील केज येथील घरून 18 लाख रुपये जप्त केले. आरोपीला परंडा कोर्टाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अप्पर पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब आणि परंडा पोलिसांनी ही कामगिरी केली आहे.
अजय चौरे याच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी 18 लाख रुपयांच्या रकमेसह काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. पोलीस निरीक्षक अमोल भुजबळ आणि सपोनि कविता मुसळे यांच्या पथकाने 18 लाख, संगणक, विविध कंपनीचे सिम कार्ड, चेकबुक जप्त केले.
आरोपी अजय चौरे आणि त्याचा साथीदार संदीप माळी याचे परंडा येथे ऑनलाईन केंद्र होते. ते तिथे आलेल्या शेतकरी याचे केवायसी आणि इतर ऑनलाईन व्हेरिफिकेशन करायचे असे सांगत बँक खात्यातून रक्कम काढून घ्यायचे. कळंब येथे दोन जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अशी करीत होते फसवणूक
पंतप्रधान सन्मान किसान योजनेच्या लाभार्थी यांची माहिती पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपये बँक खात्यावर या योजनेतून जमा होतात. आरोपी हे वेबसाईटवरून शेतकरी यांचे मोबाईल नंबर घ्यायचे आणि बँक खात्याची ऑनलाईन माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या बँकेतून परस्पर रक्कम काढली जात होती.
काही शेतकऱ्यांनी बँक खाती बॅलन्स तपासल्यावर खात्यातून पैसे काढल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर 4 आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. आरोपी हे शेतकरी यांना फोन करुन बँक खाते, आधार कार्ड आणि मोबाईल याची केवायसी करायचे आहे, असे सांगून ओटीपी आणि इतर माहिती घ्यायचे. नंतर पैसे खात्यातून इतर खात्यावर काढून घ्यायचे.