इंदापूरमध्ये शिक्षकच विद्यार्थ्यांसमोर एकमेकांना भिडले, संतप्त पालकांकडून बदलीची मागणी

| Updated on: Dec 17, 2022 | 3:38 PM

या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवीन शिक्षक येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

इंदापूरमध्ये शिक्षकच विद्यार्थ्यांसमोर एकमेकांना भिडले, संतप्त पालकांकडून बदलीची मागणी
इंदापूरमध्ये शिक्षकांमध्ये वाद
Image Credit source: TV9
Follow us on

इंदापूर : शाळा म्हणजे ज्ञानाचं मंदिर आणि इथले शिक्षक विद्यार्थी आणि समाज घडवत असतात. घरात आईवडील तर शाळेत शिक्षक मुलांवर संस्कार करत असतात. पण याच ज्ञानाच्या मंदिरात शिक्षिकांनीच विद्यार्थ्यांसमोर धक्कादायक कृत्य केलं आहे. इंदापूर तालुक्यातील चाकाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपापसात हाणामारी केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळी विद्यार्थ्यांसमोर हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

पालकांमध्ये संतापाचे वातावरण

या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या शिक्षकांची बदली करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. नवीन शिक्षक येईपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

चाकाटीच्या जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक घटना

सुभाष भिटे, उद्धव गरगडे आणि संजीवनी गरगडे अशी भांडणे करणाऱ्या शिक्षकांची नावे आहेत. भिटे आणि संजीवनी गरगडे हे चाकाटीच्या जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. संजीवनी गरगडे यांचे पती उद्धव गरगडे हे लाखेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

हे सुद्धा वाचा

दोन शिक्षकांमध्ये आधी वाद झाला होता

शुक्रवारी भिटे आणि संजीवनी गरगडे यांच्यात आधी वाद झाला होता. त्यानंतर शाळा सुटताना उद्धव गरगडे आल्यानंतर दोघांविरुध्द एक अशी धुमश्चक्री सुरु झाली.

घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद

विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसमोरच हा प्रकार घडला, बघे ही जमले. त्यांनी या हाणामारीचे फोटो काढले. मोबाईलवर चित्रण केले. ते वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाले. या प्रकारानंतर पालक स्वस्थ बसले नाहीत. त्यांनी निवेदन तयार केले आणि त्यावर इतर पालकांच्या सह्या घेतल्या. यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यांना हे निवेदन दिले.

पालकांकडून शिक्षकांच्या बदलीची मागणी

या शिक्षकांमध्ये वारंवार वादविवाद होतात. हाणामारी होते. त्यामुळे पाल्यांचे खुप मोठे नुकसान झाले आहे. पाल्यांना शाळेच्या अभ्यासक्रमातील काहीही येत नाही. त्यामुळे या दोन्ही शिक्षकांची तातडीने बदली करण्यात यावी.

नवीन शिक्षक येईपर्यंत आम्ही सर्व जण शाळा बंद करीत आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनाखाली 35 पालकांच्या सह्या आहेत. अशा गंभीर कृत्याकडे अधिकारी वर्ग काय शिक्षा करणार याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.