
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होते आहेत. पत्नी सोनम रघुवंशीनेच त्याच्या हत्येचा कट रचला होता. प्रियकर राज कुशवाह आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने हा संपूर्ण प्लॅन केला होता. या प्रकरणात पोलिसांनी तिला अटक केली आहे. ही घटना 23 मे रोजी घडली होती. परंतु पोलिसांना त्याबद्दलची माहिती 2 जून रोजी मिळालील. पोलिसांना एका पुरुषाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान ज्या व्यक्तीचा मृतदेह आढळला, त्याची पत्नी बेपत्ता असल्याचं आढळून आलं. पत्नीवरही हल्ला झाला असेल किंवा तिचं अपहरण झालं असावं असा संशय पोलिसांना होता. परंतु पत्नी सोनम रघुवंशीनेच पतीची हत्या घडवून आणल्याचं नंतर स्पष्ट झालं. सोनम रघुवंशीनेच पतीला मारण्याचा कट रचला होता. इतकंच नव्हे तर तिने तिच्या पतीला डोळ्यांसमोर मरताना पाहिलं आणि त्याचा मृतदेह दरीत फेकण्यास मदत केली.
सोमवारी सोनम उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये सापडली होती. त्यानंतर मेघालय पोलिसांना या प्रकरणाची संपूर्ण कहाणी कळली. हत्येनंतर सोनमने पळून जाण्याचा कट कसा रचला होता, हेदेखील पोलिसांना समजलं. 24 वर्षांच्या सोनम रघुवंशीने 11 मे रोजी मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या 29 वर्षीय राजा रघुवंशी याच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर हे मेघालयला हनिमूनला गेले होते. 22 मे रोजी ते शिलाँगला पोहोचले होते. त्यानंतर ते सोहरा परिसरात गेले. सोहराला चेरापुंजी असंही म्हणतात. हा परिसर पूर्व खासी हिल्स जिल्ह्यात आहे.
राजा आणि त्याच्या कुटुंबाला सोनमच्या अफेअरबद्दल पुसटशीही कल्पना नव्हती. सोनमचा प्रियकर राज कुशवाहने राजाची हत्या करण्यासाठी त्याच्या मित्रांना सुपारी दिली होती. सोनमने त्यांना 20 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. 23 मे रोजी सोनम आणि राजा मावलाखियात इथल्या एका उंच शिखरावरील धबधबा पहायला गेले. तिथेच एका निर्जन ठिकाणी सोनमने मारेकऱ्यांना राजाला मारण्यास सांगितलं. नंतर सोनमने तिच्या पतीचा मृतदेह खोल दरीत फेकण्यासही मदत केली.
पूर्व खासी हिल्सचे एसपी विवेक सायम यांनी मंगळवारी सांगितलं, “हत्येनंतर सोनमने मावलाखियातहून शिलाँगसाठी टॅक्सी केली. त्यानंतर ती एका टूरिस्ट टॅक्सीने गुवाहाटीला गेली. गुवाहाटीतून तिने ट्रेन पकडली. तर राज कुशवाहचे तीन मित्रसुद्धा सोहरा इथून गुवाहाटीला टॅक्सीने पळून गेले. नंतर त्यांनी इंदूरला जाणारी ट्रेन पकडली. हत्येनंतर कसं पळून जायचं याचाही प्लॅन त्यांनी केला होता. सोनमचा फोन अद्याप सापडलेला नाही.”
सोनम यापूर्वीही मेघालयला गेली होती का, तिने पतीच्या हत्येसाठी तेच ठिकाण का निवडलं, हे पोलिसांना अद्याप कळलेलं नाही. “तिने गुगलवर कोणती ठिकाणं निर्जन आहेत हे तपासलं असेल. कारण त्याठिकाणी बरीच जंगलं आहेत. त्यामुळे तिला हत्येची संधी सहज मिळाली. तिने चौकशीत याआधी कधीच शिलाँगला गेलं नसल्याचं सांगितलं आहे. परंतु सत्य काय आहे हे तपासानंतरच अधिक स्पष्ट होईल. ठिकाणाबद्दल त्यांच्यात काय चर्चा झाली होती, हेदेखील आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय”, अशी माहिती पोलिसांनी दिली.