लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh Crime News) लखनऊमध्ये पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) केला. तेही फक्त बायकोने त्याच्या आवडीचे जेवण बनवले नाही म्हणून. हे प्रकरण मोहनलालगंज मधील गणेश खेडा येथील आहे. नावडती भाजी करण्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्याला बायकोच्या तिखट शब्दांची फोडणी बसली. त्यानंतर नवऱ्याने तिला अर्धमेली होईपर्यंत कुऱ्हाडीने मारलं. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारी मदतीला आले, तेव्हा पती पळून गेला. या घटनेनंतर जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचबरोबर आरोपी पतीला पोलिसांनी अटक (Husband Arrested) करुन त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेशखेडा येथे राहणारा सुभाषचंद्र गौतम हा रात्री उशिरा घरी पोहोचले. पत्नी लक्ष्मी देवीने आपल्या आवडीचे जेवण बनवले नसल्याचे समजताच त्याने तिच्याशी वाद उकरुन काढला.
दाम्पत्यामध्ये बाचाबाची सुरु असतानाच पत्नी लक्ष्मी देवीचे काही शब्द त्याला चांगलेच बोचले. त्यामुळे सुभाष अधिकच चिडला आणि मागचा पुढचा काहीही विचार न करता त्याने पत्नीवर थेट कुऱ्हाडीने वार करण्यास सुरुवात केली.
पतीने कुऱ्हाडीने वार करताच पत्नीने आरडा ओरड करण्यास सुरुवात केली, पण निर्दयी पतीने तिच्यावर हल्ला करणे थांबवले नाही. त्याने तिला कुऱ्हाडीचे घाव घालून अर्धमेली केली. महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजारी तिथे धावत आले असता पतीने तिथून पळ काढला. शेजाऱ्यांनी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने आरोपी पतीचा शोध सुरू केला. पोलिसांनी लगेचच आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपी बसमध्ये बसून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस आयुक्त डीके ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीची अद्याप चौकशी सुरू आहे. पुढील कारवाई अद्याप सुरू आहे. जखमी महिलेचाही जबाब घेण्यात येणार आहे.