मुलीच्या छेडछाडीला विरोध, कुटुंबातील 16 जणांवर अॅसिड हल्ला
बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील दाऊदपूर गावात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने कुटुंबावरच हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी एकाच कुटुंबातील 16 जणांवर अॅसिड हल्ला (Bihar Acid Attack) केला. बुधवारी (28 ऑगस्ट) हा अॅसिड हल्ला (Acid Attack) झाला. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे.
पाटणा: बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील दाऊदपूर गावात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने कुटुंबावरच हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी एकाच कुटुंबातील 16 जणांवर अॅसिड हल्ला (Bihar Acid Attack) केला. बुधवारी (28 ऑगस्ट) हा अॅसिड हल्ला (Acid Attack) झाला. त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
बुधवारी काही लोकांनी दाऊदपूर येथे येत एका घरातील लोकांच्या अंगावर अॅसिड हल्ला केला. यात दोन महिलांसह 16 लोक जखमी झाले. जखमींमध्ये रूपा कुमारी, जयप्रकाश सिंह, चंद्रकला देवी, रविंद्र भगत, देवेंद्र भगत, गुडिया देवी, मनोज भगत, अनिल भगत, नवल किशोर सिंह, पिंटू भगत, अर्जुन कुमार, रोशन कुमार, महेश साह, रामानंद भगत यांचा समावेश आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे.
आरोपींनी मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने अॅसिड हल्ला केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. मुख्य आरोपींमध्ये बालेश्वर शर्मा आणि लखिंद्र शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्याचा समावेश आहे. वैशालीचे पोलीस उपाधीक्षक राघव दयाल यांनी सांगितले, “मंगळवारी काही कारणावरुन दाऊदपूर गावात राहणाऱ्या नंद किशोर भगत यांच्या कुटुंबातील सदस्यांचा काही लोकांसोबत वाद झाला. वाद विकोपाल जाऊन याचे रुपांतर मारहाणीत झाले. यानंतर हे प्रकरण थंडावले आहे आणि परिसरात शांतता आहे.”
जखमींना हाजीपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. या हल्ल्यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण आहे.