Mumbai University: जय हिंद, मिठीबाई, सेंट झेविअर्स कॉलेजच्या प्रवेशाचं स्वतंत्र वेळापत्रक! महाविद्यालयांना 8 ऑगस्टपर्यंत प्रवेश उरकण्याचे निर्देश

| Updated on: Jul 26, 2022 | 9:33 AM

Mumbai University: शहरातील महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेसाठी स्वतःच्या स्वतंत्र वेळापत्रकाचं अनुसरण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण ज्या महाविद्यालयात प्रवेशासाठी इच्छुक आहोत अशा महाविद्यालयांची अधिकृत वेबसाईट तपासावी.

Mumbai University: जय हिंद, मिठीबाई, सेंट झेविअर्स कॉलेजच्या प्रवेशाचं स्वतंत्र वेळापत्रक! महाविद्यालयांना 8 ऑगस्टपर्यंत प्रवेश उरकण्याचे निर्देश
Mumbai University
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: मुंबई विद्यापीठाने (Mumbai University) आपल्या सर्व संलग्नित कॉलेजांना सीबीएसई आणि आयएससीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करून त्यांचे प्रवेश 8 ऑगस्टपर्यंत उरकण्यास सांगितले आहे. पदवीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी 10 ऑगस्टपासून त्यांचे शैक्षणिक सत्र सुरू करण्याचे निर्देश मुंबई विद्यापीठानं दिले आहेत. शहरातील महाविद्यालये प्रवेश प्रक्रियेसाठी (Entrance Process) स्वतःच्या स्वतंत्र वेळापत्रकाचं अनुसरण करणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण ज्या महाविद्यालयात प्रवेशासाठी इच्छुक आहोत अशा महाविद्यालयांची अधिकृत वेबसाईट (Official Website) तपासावी.

अनेक महाविद्यालयांचे वेळापत्रक जाहीर

सीबीएसई आणि आयएससीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या जय हिंद कॉलेजने काल, सोमवारी आपल्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. महाविद्यालय 27 जुलै रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज मागवून त्याच दिवशी सायंकाळी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करणार आहे. 6 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. सेंट झेविअर्स कॉलेजनेही त्यांच्या पोर्टलवर वेळापत्रक टाकले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 28 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास सांगितले आहे. कॉलेजमधील पहिली गुणवत्ता यादी 30 जुलै रोजी जाहीर होणार आहे. 5 ऑगस्ट रोजी कॉलेजची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. एनएम आणि मिठीबाई कॉलेज बीए, बीकॉम आणि बीएस्सीसाठी 27 जुलैला पहिली गुणवत्ता यादी घेऊन येणार आहेत. स्वयंअर्थसहाय्यित अभ्यासक्रमांसाठी त्यांचे प्रवेश सुरू आहेत.

अकरावी प्रवेश प्रक्रिया घाईवर

दरम्यान सीबीएसई दहावीचा निकाल अखेर लागलाय. बाकी बोर्डाच्या निकालाच्या प्रतीक्षेत असणारी अकरावी प्रवेश प्रक्रिया घाईवर आलीये. यंदा अकरावी प्रवेश ऑनलाईन पद्धतीनं सुरु करण्यात आलेत, अकरावीचे कोट्यातले प्रवेश सुद्धा ऑनलाइनच सुरु करण्यात आलेत. विद्यार्थ्यांना कोट्यातून प्रवेश मिळवण्यासाठी सुद्धा पसंतीक्रमांक भरावे लागणार आहेत. ऑनलाईन अर्जाच्या भाग-२मध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईनसह इनहाऊस, अल्पसंख्याक, मॅनेजमेंट यांपैकी पर्याय निवडता येणार असून कोट्याद्वारे प्रवेशासाठी कॉलेज प्राधान्यक्रमही द्यावे लागणार आहेत. शून्य फेरी वेळी विद्यार्थ्यांना कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरता येतील.

कोट्यातील कॉलेज पसंतीक्रमही ऑनलाईन अर्जात नोंदवावे लागणार

विद्यार्थी कोणत्या कोट्यातून प्रवेश घेण्यास उत्सुक आहे त्या कोट्याचा पर्याय ऑनलाईन अर्जात द्यावा लागत होता. विद्यार्थ्यांनी कॉलेजस्तरावर कोट्यातून प्रवेश घेतल्यानंतर संबंधित कॉलेजकडून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची नोंद ऑनलाईन करण्यात येत होती. या पद्धतीत यंदा बदल करण्यात आलेला असून अपेक्षित कोटा निवडण्याबरोबच विद्यार्थ्याला त्या कोट्यातील कॉलेज पसंतीक्रमही ऑनलाईन अर्जात नोंदवावे लागणार आहेत. विद्यार्थ्यांनी दिलेल्या कॉलेज पसंतीक्रमानुसार संबंधित कॉलेजांना विद्यार्थ्यांची यादी पाठविली जाणार आहे. या यादीप्रमाणे कॉलेजांनी त्या कोट्यातील उपलब्ध जागांनुसार गुणवत्ता यादी जाहीर करून प्रवेश द्यायचे आहेत.