
UPSC Civil Services Exam 2025: यूपीएससी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा आणि भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नाही त्यांनी लवकरात लवकर यूपीएससी upsc.gov.in किंवा upsconline.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.
आयोगाने यापूर्वी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी निश्चित केली होती, जी नंतर 18 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली. यंदा 979 पदांवर अधिकारी भरतीसाठी नागरी सेवा परीक्षा घेण्यात येणार आहे.
यूपीएससीने जारी केलेल्या अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे की, “यूपीएससी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा 2025 आणि भारतीय वन सेवा (पूर्व) परीक्षा 2025 साठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत) वाढविण्यात आली आहे. याशिवाय अर्ज खिडकी बंद झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 19 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी २०२५ पर्यंत 7 दिवसांची अर्ज दुरुस्ती विंडो आता 7 दिवस खुली राहणार आहे.
यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना वन टाइम रजिस्ट्रेशन म्हणजेच ओटीआर प्रोफाइल तयार करावे लागेल. हे ओटीआर प्रोफाइल आजीवन वैध आहे. ज्या उमेदवारांनी आधीच आपले प्रोफाइल तयार केले आहे ते थेट अर्ज भरू शकतात. यूपीएससी कॅलेंडरनुसार ही परीक्षा 25 मे 2025 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात केली जाईल.
शैक्षणिक पात्रता : या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे पदवी किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे. पदवीच्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेले उमेदवारही त्यासाठी अर्ज करू शकतात, मात्र नंतर त्यांना परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे सिद्ध करावे लागणार आहे.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 1 ऑगस्ट 2025 रोजी किमान 21 वर्ष आणि कमाल 32 वर्ष असावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे.
यूपीएससी सीएसई 2025 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर महिला / एससी / एसटी / बेंचमार्क अपंग प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
अनारक्षित प्रवर्गातील उमेदवार यूपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी जास्तीत जास्त सहा वेळा प्रयत्न करू शकतात, तर ओबीसी उमेदवार नऊ वेळा परीक्षा देऊ शकतात. त्याचबरोबर एससी आणि एसटी उमेदवार किती वेळा परीक्षा देऊ शकतात यावर कोणतीही मर्यादा नाही.