उदयनराजे यांचं नाव घेताच शरद पवार यांनी उडवली कॉलर; साताऱ्यात नेमकं काय घडलं?

| Updated on: Mar 29, 2024 | 4:06 PM

आमची संसदीय बोर्डाची मिटिंग सुरू आहे. ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने आम्ही लढणार आहोत. राज्यात भाजपविरोधातील जे घटक आहेत. त्यांचा एक संच तयार झाला आहे. काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी त्यात आहे. डाव्या आणि प्रागतिक विचाराचे पक्ष आहेत. सीपीआय, सीपीएम आहेत. शेकाप आहे. सर्व निर्णय यांच्याशी चर्चा करून घेतले जाईल. ती प्रक्रिया आमची सुरू आहे, असं शरद पवार म्हणाले.

उदयनराजे यांचं नाव घेताच शरद पवार यांनी उडवली कॉलर; साताऱ्यात नेमकं काय घडलं?
udayanraje bhosale
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सातारा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात शरद पवार यांनी आधी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधत विविध प्रश्नांची उत्तरे दिली. साताऱ्याच्या जागेपासून ते वंचित बहुजन आघाडीपर्यंतच्या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तरे दिली. यावेळी शरद पवार यांना छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांची हुबेहुब नक्कल करत कॉलर उडवून दाखवली.

उदयनराजे यांनी तुम्हाला साताऱ्याच्या जागेसाठी संपर्क केला का? त्यांच्याशी तुम्ही चर्चा करणार आहात का? असा सवालही शरद पवार यांना केला. उदयनराजेंसारखी कॉलर उडवणार का? असा सवालही यावेळी विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्यामुळे एकच हशा पिकला. आपल्या या नकलेवर खुद्द शरद पवारही दिलखुलास हसले. साताऱ्यात राष्ट्रवादीचाच उमेदवार राहणार आहे. उदयनराजेंनी आपल्याशी संपर्क केला नाही. उदयनराजे आता भाजपमध्ये आहेत. काल त्यांचं सातारकरांनी केलेलं स्वागत मी पाहिलं. रस्त्यावर गर्दी झाली होती, असं शरद पवार म्हणाले.

चव्हाणांना उमेदवारी नाही

पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्याची जागा देणार का? असा सवालही करण्यात आला. त्यावर साताऱ्याची जागा राष्ट्रवादीची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचाच उमेदवार इथे उभा राहील, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी वैद्यकीय कारणामुळे निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. त्यांच्या प्रकृतीची तुमच्यापेक्षा मला जास्त माहीत आहे. निवडणुकीत संघर्ष करण्यासारखी त्यांची प्रकृती नाही. त्यामुळे साताऱ्याबाबत काय निर्णय घ्यायाच याबाबत तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मनाचा कानोसा घेण्यात आला आहे. दोन चार लोकांची नावे सुचवली गेली आहेत. संध्याकाळच्या बैठकीत अहवाल मांडून विचारविनियम केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पाच नावे चर्चेत

शशिकांत शिंदे, सुनील माने, बाळासाहेब पाटील, सत्यजित पाटणकर आणि श्रीनिवास पाटील यांचंही नाव साताऱ्यासाठी समोर आलं आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. त्यासाठी आमची संध्याकाळी बैठक होत आहे, असं ते म्हणाले.

उमेदवारही पळवले जात आहेत

माढातून धनगर समाजाला तिकीट द्यावं अशी आमची इच्छा होती. महादेव जानकरांशी बोलणं झालं होतं. त्यांनी संमतीही दिली होती. पण नंतर काय झालं माहीत नाही. निवडणुकीत मतदार पळवतात, पण उमेदवारही पळवले जातात असं दिसतंय. त्यामुळे आमची इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य उमेदवाराचा शोध घेत आहे. आमच्याकडे अनेकांचे अर्ज आले आहेत. त्यात अनेक उच्चशिक्षित आहेत. पण सामाजिक जाण असलेल्यांना तिकीट द्यायची आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. वंचितने आमच्यासोबत यावं हा आमचा प्रयत्न आहे. आघाडींच्या बैठकांच्या काही चर्चेत मी नव्हतो. वंचितचा जागेचा काही इश्यू असू शकतो, असं त्यांनी सांगितलं.