400 हिट आणि 50 ब्लॉकबस्टर चित्रपट देणारा भारतीय अभिनेता, ज्याच्या पुढे शाहरुख-अमिताभ बच्चन फेल
400 हिट आणि 50 ब्लॉकबस्टर देणारा भारतातील सर्वात यशस्वी अभिनेता. ज्याच्या विक्रमा पुढे शाहरुख खान- अमिताभ बच्चन आणि रजनीकांत देखील आहेत फेल. कोण आहे तो अभिनेता?

अमिताभ बच्चन, दिलीप कुमार, रजनीकांत, चिरंजीवी आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गज कलाकारांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे सुपरस्टार मानले जाते. मात्र, हिट चित्रपटांची संख्या पाहिली तर मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रेम नजीर हे या सर्वांपेक्षा पुढे असल्याचे दिसून येते. चाहत्यांनी त्यांना ‘नित्यहरित नायकन’ म्हणजेच सदाबहार अभिनेता अशी उपाधी दिली होती.
प्रेम नजीर यांनी तब्बल तीन दशकांहून अधिक काळ मल्याळम सिनेसृष्टीवर राज्य केले. 1950च्या दशकापासून 1980च्या दशकापर्यंतच्या त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी जवळपास 1000 चित्रपटांमध्ये काम केले, त्यापैकी सुमारे 700 चित्रपटांमध्ये ते नायकाच्या भूमिकेत दिसले. त्यांच्या नावावर सर्वाधिक चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेता म्हणून काम करण्याचा विक्रमही जोडला जातो.
400 हिट अन् 50 ब्लॉकबस्टर देणारा अभिनेता
त्यांच्या कारकिर्दीत 400 हून अधिक हिट आणि सुमारे 50 ब्लॉकबस्टर चित्रपट असल्याचे उद्योगातील आकडेवारीत सांगितले जाते. तुलना केली तर अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीत सुमारे 60 हिट आणि 11 ब्लॉकबस्टर चित्रपट मानले जातात. रजनीकांत यांच्या नावावर सुमारे 70 हिट आणि डझनभर ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. तर शाहरुख खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्याकडे साधारण 35 ते 38 हिट चित्रपटांचा आकडा आहे. सलमान खानने मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक, म्हणजेच सुमारे 15 ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याचा विक्रम केला आहे.
प्रेम नजीर यांचा जन्म 1929 मध्ये अब्दुल खादर या नावाने झाला. 1952 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ‘विसाप्पिन्टे विली’ या चित्रपटामुळे त्यांच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी मिळाली आणि याच काळात त्यांना ‘प्रेम नजीर’ हे स्टेज नेम मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
एका वर्षात तब्बल 39 चित्रपट
1950च्या दशकाच्या अखेरीस ते मल्याळम चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय स्टार बनले होते. पुढे त्यांनी सामाजिक अन्यायाविरोधात लढणाऱ्या व्यक्तिरेखा साकारण्यास सुरुवात केली. या भूमिकांमुळे त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर पडली. सामाजिक विषयांबरोबरच त्यांनी पौराणिक चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या. पडद्यावर ते कधी प्रभू राम, कधी श्रीकृष्ण तर कधी अय्यप्पा यांच्या भूमिकेत दिसले.
1979 मध्ये त्यांनी एका वर्षात तब्बल 39 चित्रपटांमध्ये काम केले, हा त्यांच्या कारकिर्दीतील आणि चित्रपटसृष्टीतील अत्यंत उल्लेखनीय विक्रम मानला जातो.
