IPL टीम का विकत घेतली नाही? अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला, “माझी तेवढी लायकी..”

अभिषेक बच्चनने कबड्डी आणि फुटबॉलच्या टीम्समध्ये चांगली गुंतवणूक केली आहे. परंतु अद्याप त्याने आयपीएलमध्ये कोणतीच टीम विकत घेतली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यामागचं स्पष्ट कारण सांगितलं आहे.

IPL टीम का विकत घेतली नाही? अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला, माझी तेवढी लायकी..
Abhishek and Amitabh Bachchan
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 15, 2026 | 10:00 AM

अभिनेता अभिषेक बच्चनला खेळांमध्ये प्रचंड आवड आहे. याच आवडीमुळे त्याने स्पोर्ट्स विश्वात चांगली गुंतवणूक केली आहे. तो ‘प्रो कबड्डी लीग’मधील जयपूर पिंक पँथर्सचा मालक आहे, तर ‘टीम चेन्नईयिन एफसी’मध्येही त्याने भागीदारी केली आहे. कबड्डी आणि फुटबॉलमध्ये रस दाखवणाऱ्या अभिषेकने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) कोणतीच गुंतवणूक केलेली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने यामागचं कारण सांगितलं आहे. “मला अशी एकही व्यक्ती माहीत नाही, ज्याला आयपीएल आवडत नसेल. मी याला स्पोर्ट्स मनोरंजनाचा सर्वोत्तम फॉरमॅट मानतो. मलाही त्यात सहभागी व्हायचं होतं, परंतु जेव्हा आयपीएल सुरू झालं होतं, तेव्हा हे टीम्स खूप महागडे होते आणि मी नवोदित अभिनेता होतो”, असं तो म्हणाला.

‘फोर्ब्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने पुढे सांगितलं, “इंडस्ट्रीत मी हळूहळू चांगला पैसा कमावू लागलो होतो. परंतु तेव्हा आयपीएल टीम माझ्या बजेटच्या किंवा माझ्या लायकीच्या पूर्णपणे बाहेर गेल्या होत्या. त्यातही महत्त्वाचं म्हणजे, मी त्यात काय योगदान देऊ शकतो, हेच मला समजत नव्हतं. इन्फ्रास्ट्रक्चर आणि पायाभूत सुविधांची कामं बीसीसीआय खूप चांगल्याप्रकारे करतं. मग त्यात मी काय नवीन आणू शकतो? मी अशी व्यक्ती नाही, जी फक्त स्टँडमध्ये बसून हात हलवत राहील आणि म्हणेल.. पहा स्टार आलाय. जर तुम्ही माझे सामने पाहिले असतील, तर तुमच्या लक्षात आलं असेल की मी त्यात किती गुंतून राहतो. मी खेळाडूंसोबत बसतो, त्यांच्यासोबत राहतो. गरज पडल्यास त्यांना प्रशिक्षणसुद्धा देतो. रोज काय खायचं, हेसुद्धा मीच अप्रूव्ह करतो. मी प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीला मायक्रोमॅनेज करतो. हीच माझी स्टाइल आहे.”

फक्त प्रसिद्धीसाठी मला स्पोर्ट्स टीम नको होती, असं अभिषेकने स्पष्ट केलं. “मला खऱ्या अर्थाने भागीदारी पाहिजे होती. याच कारणामुळे मी जयपूर पिंक पँथर्स आणि चेन्नईयिन एफसीमध्ये पूर्णपणे सक्रिय आहे. आयपीएल सुरू झालं तेव्हा मी त्यात कसं योगदान देऊ शकेन हे मला माहीत नव्हतं. कारण त्यावेळी मला खेळाबद्दल इतकी माहिती नव्हती. मी क्रिकेटशिवाय इतर खेळांशी जास्त परिचित होतो. पण मी कधी हार मानत नाही. कदाचित भविष्यात काहीतरी घडू शकेल”, असं सूचक वक्तव्य त्याने केलं.

2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली होती आणि त्याच सुमारास अभिषेक बच्चन ‘धूम’, ‘धूम 2’, ‘गुरू’, ‘एलओसी कारगिल’ यांसारख्या चित्रपटांमधून इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करत होता. नंतर 2014 मध्ये तो जयपूर पिंक पँथर्स या कबड्डी टीमचा मालक बनला. त्याच वर्षी ऑगस्टमध्ये त्याने चेन्नईयिन एफसीचा सहमालक बनून फुटबॉलमध्ये प्रवेश केला. या दोन्ही संघांनी प्रो कबड्डी लीग आणि इंडियन सुपर लीगमध्ये प्रचंड यश मिळवलं आहे.

Follow Us