
स्वत:च्या अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात सध्या अटकेत आहे. याप्रकरणी अनेकांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संशयित खरातच्या भोंदुगिरीविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. खरातच्या अटकेनंतर 58 रहस्यमय व्हिडीओ पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये अनेक बड्या हस्ती तसंच राजकीय नेत्यांचाही संबंध असण्याची अंनिसला दाट शंका आहे. सध्या अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. याप्रकरणी आता मराठी अभिनेता अतुल कुलकर्णीने मार्मिक पोस्ट लिहिली आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित त्याने या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे आणि विचार करायला लावणारे प्रश्न उपस्थित केले आहेत.
पकडलं गेल्यावरच आणि त्यानंतरच एखादी व्यक्ती भोंदू ठरते का, मग त्याआधी ते काय असतात, शिवाय जे कधीच पकडलेच जात नाही, ते कोण असतात.. असा सवाल अतुल कुलकर्णीने त्याच्या पोस्टद्वारे केला आहे. अशा भोंदूबाबांचे भक्त आणि त्यामागील राजकारण, धर्मकारण यांवरही त्याने टीका केली आहे. अशा भोंदूबाबांवर आंधळी श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांनाही त्याने फटकारलं आहे. अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे, असा प्रश्न अतुलने विचारला आहे.
पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’?
त्या आधी ते काय असतात?
आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते?ज्या वेळी कुणी ‘महाराज’ भाोंदू ‘निघतात’,
तेंव्हा त्यांचे भक्तं नेमके कोण होतात?
भागीदार, पिडीत, अंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी?
(१/२)#globalphenomenon— atul kulkarni (@atul_kulkarni) March 22, 2026
‘पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’? त्या आधी ते काय असतात? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते? ज्या वेळी कुणी ‘महाराज’ भोंदू ‘निघतात’, तेव्हा त्यांचे भक्त नेमके कोण होतात? भागीदार, पीडित, आंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी? हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)?, असा सवाल त्याने केला आहे.
या पोस्टमध्ये त्याने पुढे विचारलंय, ‘श्रद्धा अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय? डोळस आणि अंधश्रद्धा यामधे अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे? आंधळं होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते?’