Bhagyashree: भाग्यश्री यांच्या कुटुंबात वारसाहक्काचा वाद; दत्तक मुलाला संपत्तीत हक्क मिळतो का? कायदा काय सांगतो?
Bhagyashree: सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानात उत्तराधिकारी पदावरून वाद निर्माण झाला आहे. संस्थानाचा युवराज म्हणून आदित्यराजेच काम पाहतील हा माझा निर्णय आहे, असं अभिनेत्री भाग्यश्री यांच्या वडिलांनी जाहीर केलं.

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन-दासानी यांच्यामुळे सांगलीतील पटवर्धन कुटुंबातील जुना कौटुंबिक आणि वारसाहक्काचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवादरम्यान भाग्यश्री यांनी सांगलीच्या ऐतिहासिक गणपती पंचायतन मंदिरात आरती केल्यानंतर हा वाद समोर आला. त्यानंतर त्यांचे वडील विजयसिंह राजे पटवर्धन यांनी दत्तक पुत्र आदित्यराजे पटवर्धन हे संस्थानचे उत्तराधिकारी असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे दत्तक घेतलेल्या मुलाला कुटुंबाच्या संपत्तीवर कायदेशीर हक्क असतो का? हा प्रश्न चर्चेत आहे.
नेमका वाद काय?
गणेश चतुर्थीच्या दिवशी भाग्यश्री यांनी गणपतीची आरती केली. यानंतर पटवर्धन कुटुंबात उत्तराधिकारी आणि मंदिरातील पारंपरिक मानावरून मतभेद समोर आले. विजयसिंह राजे पटवर्धन यांनी आदित्यराजे यांना दत्तक घेतलं असून तेच संस्थानचे उत्तराधिकारी असल्याचं सांगितलं. आदित्यराजे हे जयदीप अभ्यंकर यांचे पुत्र असून 2023-24 दरम्यान त्यांना दत्तक घेण्यात आलं. या पार्श्वभूमीवर भाग्यश्री यांना वारसाहक्क आहे का आणि दत्तक मुलाला पोटच्या मुलाप्रमाणेच संपत्तीचा अधिकार मिळतो का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दत्तक मुलाबद्दल कायदा काय सांगतो?
हिंदू कुटुंबांसाठी ‘हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स एक्ट, 1956’ हा दत्तक प्रक्रियेचा महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्यातील कलम 12 नुसार, वैधरीत्या दत्तक घेतलेलं मूल दत्तक घेतल्याच्या तारखेपासून दत्तक आई-वडिलांचं मूल मानलं जातं. म्हणजेच कायदेशीर दत्तक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दत्तक मुलाला कुटुंबातील मुलाचा दर्जा मिळतो. मात्र, दत्तक घेतलं म्हणजे संबंधित व्यक्ती आपोआप संपूर्ण संपत्तीचा एकमेव मालक बनतो, असा अर्थ होत नाही. वारसाहक्कासाठी संपत्तीचा प्रकार, मृत्युपत्र आहे की नाही, इतर कायदेशीर वारस कोण आहेत आणि संबंधित मालमत्तेवर कोणाचे आधीपासून अधिकार आहेत, यासारख्या बाबी महत्त्वाच्या ठरतात.
जर आई-वडिलांनी स्वतःच्या कमाईतून एखादी संपत्ती खरेदी केली असेल, तर सामान्यतः त्या संपत्तीच्या मालकाला वैध मृत्युपत्राद्वारे ती संपत्ती आपल्या इच्छेनुसार कोणालाही देण्याचा अधिकार असतो. त्यामुळे एखादी व्यक्ती आपल्या मृत्यूनंतर स्वतःच्या कमाईच्या संपत्तीचं वाटप कसं करायचं, हे कायद्यानुसार ठरवू शकते. मात्र, मालकाने मृत्युपत्र न करता निधन झाल्यास, संपत्तीच्या वारसाहक्काचा निर्णय हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार घेतला जातो. अशा परिस्थितीत कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा इतर पात्र वारसांसोबत मुलगा म्हणून संपत्तीमध्ये हक्कदार ठरू शकतो.
दत्तक मुलाला संपत्तीत हिस्सा मिळतो का?
वैध दत्तक असल्यास दत्तक मुलाला दत्तक कुटुंबातील मुलाचा कायदेशीर दर्जा मिळतो. त्यामुळे लागू असलेल्या वारसाहक्काच्या नियमांनुसार तो संपत्तीचा वारस ठरू शकतो. मात्र, याचा अर्थ प्रत्येक मालमत्तेवर किंवा संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीवर त्याचा एकट्याचा अधिकार असेलच असं नाही. विशेष म्हणजे, मुलगी असल्यामुळे भाग्यश्री यांचे वारसाहक्क आपोआप संपत नाहीत. हिंदू वारसाहक्काच्या नियमांनुसार पात्र मुलींनाही संबंधित परिस्थितीत वारस म्हणून अधिकार मिळू शकतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ‘उत्तराधिकारी’ घोषित करण्यात आलं असलं, तरी प्रत्येक मालमत्तेचा स्वतंत्र कायदेशीर तपास आवश्यक असतो.
या प्रकरणात काय महत्त्वाचं?
पटवर्धन कुटुंबाने आदित्यराजे यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, संस्थानशी संबंधित मालमत्ता, पारंपरिक अधिकार आणि वैयक्तिक संपत्ती यांचे कायदेशीर स्वरूप वेगवेगळे असू शकते. त्यामुळे ‘दत्तक मुलगा म्हणजे संपूर्ण संपत्तीचा एकमेव वारस’ असा सरसकट निष्कर्ष काढता येत नाही. या प्रकरणातील नेमके हक्क ठरवण्यासाठी दत्तक प्रक्रिया कायदेशीरदृष्ट्या वैध आहे का, संबंधित मालमत्ता कोणत्या प्रकारची आहे आणि कोणती कागदपत्रे किंवा मृत्युपत्र अस्तित्वात आहे, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
