‘कॅनडा कुमार’ची टीका करणाऱ्यांना अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर; नागरिकत्व सोडण्याविषयी म्हणाला..

| Updated on: Feb 24, 2023 | 8:57 AM

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा तो पासपोर्टबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. "भारत माझ्यासाठी सर्वस्व असून मी पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे", असं त्याने सांगितलं.

कॅनडा कुमारची टीका करणाऱ्यांना अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर; नागरिकत्व सोडण्याविषयी म्हणाला..
Akshay Kumar
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : अक्षय कुमारला त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वावरून अनेकदा टीकांचा सामना करावा लागला. सोशल मीडियावर त्याला ‘कॅनडा कुमार’ म्हणूनही ट्रोल केलं जातं. जवळपास तीन वर्षांपूर्वी अक्षयने सांगितलं होतं की तो लवकरच भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणार आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुन्हा एकदा तो पासपोर्टबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे. “भारत माझ्यासाठी सर्वस्व असून मी पासपोर्ट बदलण्यासाठी अर्ज केला आहे”, असं त्याने सांगितलं.

काय म्हणाला अक्षय?

“भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही कमावलं आणि मला जे काही मिळालं ते सर्व इथूनच मिळालं. मी नशीबवान आहे की मला त्याची परतफेड करायचीही संधी मिळाली. जेव्हा कोणतीच माहिती नसताना लोक तुमच्याविषयी बोलतात तेव्हा खूप वाईट वाटतं”, असं तो म्हणाला.

वर्षभरात चार ते पाच चित्रपट करणाऱ्या अक्षयला एकेकाळी बॉलिवूडमध्ये प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. 1990 च्या काळात त्याने जवळपास 15 हून अधिक फ्लॉप चित्रपट दिले होते. बॉक्स ऑफिसवर चित्रपटांना यश मिळत नसल्याने त्याने कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. “मी विचार केला की इथे माझे चित्रपट चालत नाहीयेत आणि मला काम करणं गरजेचं होतं. मी कॅनडाला कामासाठी गेलो होतो. माझा मित्र तिथे राहत होता आणि त्याने मला कामासाठी तिथे बोलावून घेतलं. त्यावेळी मी कॅनेडियन नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि तो मला मिळाला”, असं अक्षयने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

पासपोर्टविषयी काय म्हणाला अक्षय?

“माझे फक्त दोन चित्रपट प्रदर्शित व्हायचे होते आणि सुदैवाने ते दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले. माझा मित्र म्हणाला की तू पुन्हा भारतात जा आणि अभिनयाला सुरुवात कर. त्यानंतर मला आणखी काही चित्रपटांचे ऑफर्स मिळाले आणि मी पुन्हा इंडस्ट्रीत काम करू लागलो. माझ्याकडे पासपोर्ट आहे हे मी विसरलोच होतो. हा पासपोर्ट बदलावा याचा विचार मी कधी केला नव्हता. पण आता मी त्यासाठी अर्ज केला आहे”, असं अक्षयने सांगितलं.

लोकसभा निवडणुकीपूर्वी एप्रिल 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीनंतर अक्षय कुमारचं नागरिकत्व चर्चेचा विषय ठरला होता. याआधीही अक्षयने नागरिकत्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली होती. “माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याने मी इतरांपेक्षा कमी भारतीय ठरत नाही. मी भारतीयच आहे. मी गेल्या नऊ वर्षांपासून इथे आहे, जेव्हा मला पासपोर्ट मिळाला होता. तेव्हा काय घडल, कशामुळे वगैरे त्याबद्दल मला बोलायचं नाही. माझे चित्रपट चांगले चालत नव्हते. होय, मी 2019 मध्ये म्हटलं होतं की मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि नंतर कोरोना महामारी आली. त्यामुळे दोन-अडीच वर्षे सर्व गोष्टी बंद पडल्या.” लवकरच त्याला भारतीय पासपोर्ट मिळणार असल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं.