5 वर्षांनंतर ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका का सोडली? अक्षय मुडावदकरने सांगितलं कारण

'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय मुडावदकरने भूमिकेचा आणि मालिकेचा निरोप घेतला आहे. आता मालिकेत अभिनेते सुनील गोडसे हे स्वामींच्या भूमिकेत दिसणार आहेत.

5 वर्षांनंतर जय जय स्वामी समर्थ मालिका का सोडली? अक्षय मुडावदकरने सांगितलं कारण
Akshay Mudawadkar
Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 23, 2026 | 12:22 PM

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. या मालिकेत अभिनेता अक्षय मुडावदकर गेल्या पाच वर्षांपासून स्वामी समर्थांची भूमिका साकारत आहे. परंतु नुकतंच त्याने या मालिकेचा निरोप घेतला आहे. स्वामींच्या भूमिकेत अक्षयचा खूप मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. त्यामुळे त्याने मालिका सोडल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. आता अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ पोस्ट करत मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे.

काय म्हणाला अक्षय?

“नमस्कार, गेली 5 वर्षे आणि 1750 हून अधिक भाग मला स्वामींची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याकरता मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि हा स्वामींचा आशीर्वाद मानतो. त्याचबरोबर तुम्ही रसिक प्रेक्षकांनी गेली पाच वर्षे भरभरून प्रेम दिलं, त्याकरता मी तुमचा कायम ऋणी असेन. पण ज्याप्रमाणे एखादा प्रवास जेव्हा सुरू होतो, तेव्हा तो कुठेतरी थांबणार हे निश्चित असतं. याचप्रमाणे माझासुद्धा स्वामींच्या भूमिकेतील प्रवास हा इथवरच होता. हा प्रवास जरी इथे थांबत असला तरी ही भूमिका आणि हा प्रवास माझ्यासाठी कायम खास असेल. भविष्यात मी विविध भूमिका केल्या तरी स्वामींची भूमिका ही माझ्यासाठी कायम अग्रस्थानी असेल. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. कलर्स मराठी वाहिनी आणि निर्मात्यांचेही आभार मानतो, कारण त्यांनी मला ही संधी दिली, म्हणून मला ही भूमिका साकारता आली. यापुढे आपली भेट जरी मालिकेतून होणार नसली तरीसुद्धा मी माझ्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर सक्रिय असेन,” असं त्याने स्पष्ट केलं.

अक्षयच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तुम्ही मालिकेत परत या’, अशी विनंती काहींनी केली आहे. तर ‘तुम्हाला पाहून मन प्रसन्न व्हायचं’, अशा शब्दांत चाहत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. ‘माझ्या व्हिडीओवर तुम्ही व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया, भावना आणि प्रेम माझ्यापर्यंत पोहोचलं. खरंच मी नि:शब्द आहे. तुमचं हे प्रेम आणि साथ कायम अशीच राहू दे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे शतश: आभार’ असं लिहित अक्षयने कृतज्ञता व्यक्त केली आहे. या मालिकेत आता अक्षयच्या जागी अभिनेता सुनील गोडसे स्वामींची भूमिका साकारणार आहेत.

Follow Us