जेव्हा स्वामीच स्वामींच्या भेटीला जातात..; अक्षय मुडावदकर अक्कलकोटच्या दर्शनाला, म्हणाले “देव जे देईल ते..”
'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत स्वामींची भूमिका साकारलेले अभिनेते अक्षय मुडावदकर यांनी अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतलं. हा प्रवास त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवला आहे. त्यावर स्वामीभक्तांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. अभिनेता अक्षय मुडावदकर हे गेल्या पाच वर्षांपासून या मालिकेत स्वामी समर्थांची भूमिका साकारत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ही मालिका सोडली होती. मालिका सोडल्यानंतर अक्षय हे सोशल मीडियावर सक्रिय असून विविध अपडेट्स ते चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त ते अक्कलकोटला दर्शनासाठी गेले होते. या प्रवासाचा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
“कधी कधी मन शांत करायला एक प्रवास, एक ठिकाण पुरेसं असतं. आज मी निघालोय अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाकरिता. चला तर मग तुम्हालाही घेऊन जातो. रस्ते तेच, भावना त्याच… प्रत्येक किलोमीटरसोबत मन थोडं थोडं हलकं होत चाललं आहे. अक्कलकोटला जात असताना मला कायम असं वाटतं की हा प्रवास फक्त अंतराचा नाही तर अंतर्आत्म्याकडे जाण्याचा आहे, ही भावना फार वेगळी आहे, नेक्स्ट लेव्हल आहे,” असं अक्षय या व्हिडीओत म्हणाले.
दर्शनानंतर त्यांनी आपला अनुभव सांगितला. “स्वामींचं दर्शन झालं आहे आणि आता मी परतीच्या प्रवासाला निघालो आहे. हा प्रवास खूपच सुंदर होता, अविस्मरणीय होता. इथे आलं की कायमच खूप शांत वाटतं. खरंतर देवाकडे काही मागणार नाही, आपण फक्त कृतज्ञ व्हायचं असतं आणि देव जे देईल ते स्वीकारायचं असतं,” अशा शब्दांत ते व्यक्त झाले. अक्षय यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘डोळे बंद करून स्वामींचं स्मरण केलं की तुमचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. आमच्यासाठी तुम्हीच स्वामी आहात,’ असं एकाने लिहिलं. तर ‘मला तुमच्यात श्री स्वामी समर्थ दिसतात, कारण तुम्ही मला श्री स्वामी समर्थांसारखे दिसता,’ अशी कमेंट दुसऱ्या युजरने केली. ‘स्वामी स्वामींच्या भेटीला.. तुम्हाला बघून डोळ्यात पाणी आलं’, अशा भावना नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिका सोडल्यानंतर अक्षय यांनी व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले होते. “गेली 5 वर्षे आणि 1750 हून अधिक भाग मला स्वामींची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. याकरता मी स्वत:ला भाग्यवान समजतो आणि हा स्वामींचा आशीर्वाद मानतो. त्याचबरोबर तुम्ही रसिक प्रेक्षकांनी गेली पाच वर्षे भरभरून प्रेम दिलं, त्याकरता मी तुमचा कायम ऋणी असेन. पण ज्याप्रमाणे एखादा प्रवास जेव्हा सुरू होतो, तेव्हा तो कुठेतरी थांबणार हे निश्चित असतं. याचप्रमाणे माझासुद्धा स्वामींच्या भूमिकेतील प्रवास हा इथवरच होता. हा प्रवास जरी इथे थांबत असला तरी ही भूमिका आणि हा प्रवास माझ्यासाठी कायम खास असेल. भविष्यात मी विविध भूमिका केल्या तरी स्वामींची भूमिका ही माझ्यासाठी कायम अग्रस्थानी असेल,” असं त्यांनी म्हटलं होतं.