
Holi Song: होळी म्हणजे रंगांचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा सण. देशभरात 4 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार असून दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना या सणाची उत्सुकता लागून राहिली आहे. रंग, गुलाल, पिचकारी आणि गोडधोड पदार्थ यांशिवाय होळी पूर्ण होत नाही; मात्र आणखी एक गोष्ट आहे ज्याशिवाय हा सण अपूर्ण वाटतो ती म्हणजे होळीची गाणी.
दरवर्षी हिंदी आणि भोजपुरी चित्रपटसृष्टीत होळीवर आधारित अनेक नवी गाणी प्रदर्शित होतात. तरीही एक जुने गाणे असे आहे जे प्रत्येक वेळी नव्या गाण्यांवर मात करताना दिसते. ते गाणे म्हणजे ‘रंग बरसे भीगे चुनर वाली’. हे गाणे लागले की होळीच्या कार्यक्रमात आपोआपच रंगत वाढते.
लोकप्रिय होळी गीत
14 ऑगस्ट 1981 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिलसिला’ या चित्रपटातील हे गाणे आजही सर्वाधिक लोकप्रिय होळी गीत मानले जाते. तब्बल 45 वर्षांनंतरही होळी पार्टीत ‘रंग बरसे’ वाजले की नाचणाऱ्यांचे पाय थांबत नाहीत. या गाण्याशी संबंधित काही रंजक गोष्टीदेखील आहेत. हे गाणं सुप्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांनी लिहिले होते तर या गाण्याला आवाज स्वतः अमिताभ बच्चन यांनी दिला होता. त्यामुळे या गाण्याला एक वेगळीच ओळख मिळाली.
हे गाणे अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, या चित्रपटानंतर अमिताभ आणि रेखा यांनी एकत्र काम केले नाही. त्यामुळे ‘सिलसिला’ हा त्यांचा शेवटचा एकत्रित चित्रपट ठरला. या गाण्यात अमिताभ आणि रेखा यांच्यासोबत जया बच्चन आणि संजीव कुमार हेही कलाकार झळकले होते.
बॉक्स ऑफिसवर अपयश
जरी ‘रंग बरसे’ हे गाणं आजही सुपरहिट मानले जात असले तरी चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरला नाही. भारतात हा चित्रपट अपयशी ठरला. मात्र त्यातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती यश चोप्रा यांनी केली होती. त्या काळात रेखा आणि जया बच्चन यांना एकत्र काम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. तरीदेखील भारतीय प्रेक्षकांनी चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. मात्र इंग्लंड आणि अमेरिकेतील हिंदी चित्रपटप्रेमींनी ‘सिलसिला’ला मोठी पसंती दिली होती.
आजही होळीच्या सणात ‘रंग बरसे’ हे गाणे लागले की वातावरण रंगतदार होते आणि सणाचा आनंद द्विगुणित होतो. काळ बदलला, गाणी बदलली, पण या एका गाण्याची जादू मात्र अजूनही कायम आहे.