Amruta Khanvilkar: मला ढसाढसा रडायलाच येतं..; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अमृता खानविलकरचा व्हिडीओ
Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर गेल्या दीड वर्षापासून नवऱ्यापासून वेगळी राहत आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केलेल्या व्हिडीओत ती म्हणाली, "हल्ली मला ढसाढसा रडायला येतं."

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयकौशल्याचा ठसा उमटविणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अमृता आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा हे गेल्या दीड वर्षापासून वेगवेगळे राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या जवळच्या व्यक्तीने याविषयीचा खुलासा केला असून अद्याप घटस्फोटाबद्दल काही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या चर्चांदरम्यान अमृताने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओंमध्ये ती तिच्या दैनंदिन आयुष्याबद्दलचे विविध अपडेट्स देताना दिसत आहे. सध्या अमृता ‘लग्न पंचमी’ या नाटकाच्या प्रयोगांसाठी परदेशात असून तिथून तिने काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. यातील एका व्हिडीओमध्ये ती “हल्ली मला चिडचिड होत नाही, मला असं ढसाढसा रडायला येतं,” असं म्हणाली.
काय म्हणाली अमृता?
“हल्ली मला चिडचिड होत नाही, मला असं ढसाढसा रडायला येतं. तुम्हालाही असं कधी होतं का? मला कळवा. हार्मोनलच्या गोष्टींमुळे असं होत असावं, असं मला वाटतं. असं डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागतं. मग स्वत:च्याच गोष्टींवर राग निघतो. चिडचिड सोडून आता रडायलाच येतं, तुमच्यासोबतही असं घडतं का,” असं अमृताने फॉलोअर्सना विचारलं. त्यानंतर अनेकांनी तिला मेसेजेस केले. चाहत्यांच्या प्रतिक्रियांनंतर तिने आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यात ती म्हणाली, “काल अनेक मुलींनी मला मेसेज केले. काही मुली तर इतक्या गोड आहेत, त्यांनी मला काही टेस्ट करून घेण्याचा सल्ला दिला. हो रे, कळलंय मला. हे टेस्ट करायची गरज आहे, हार्मोनल चेंजेस आहेत वगैरे वगैरे.. कळलंय मला.”
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, अमृता खानविलकर आणि तिचा पती हिमांशू मल्होत्रा गेल्या काही काळापासून वेगवेगळे राहत आहेत. परंतु दोघांमध्ये विभक्त होण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. अमृता आणि हिमांशू यांनी जानेवारी 2015 मध्ये लग्न केलं होतं. लग्नापूर्वी दोघं बरीच वर्षे एकमेकांना डेट करत होते. आता वेगवेगळे राहत असूनही दोघांमध्ये चांगले संबंध असल्याचं कळतंय.
अमृता आणि हिमांशूच्या जवळच्या व्यक्तीने याविषयी सांगितलं, “होय, अमृता आणि हिमांशू गेल्या दीड वर्षापासून वेगळे राहत आहेत. पण त्यांच्यात कायदेशीररित्या विभक्त होण्याबद्दल किंवा घटस्फोटाबद्दल कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यांची मैत्री अजूनही घट्ट आहे आणि नियमितपणे संपर्कात राहून वैयक्तिक आणि कामाच्या बाबींवर चर्चा करतात. आर्थिक बाबी, करिअरमधील वेगवेगळे प्राधान्यक्रम आणि आपापल्या कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या यांसारख्या घटकांमुळे त्यांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.”