प्रत्येक वयोगातील व्यक्तीची जीभ घसरलेली..; मोदींबद्दल अपमानास्पद भाषा बोलणाऱ्यांना अनुपम खेर यांनी सुनावलं
मतभेद असले तरी मर्यादा पाळा, कारण एका सभ्य समाजाची ओळख फक्त त्याच्या विचारांनीच नाही तर ते विचार व्यक्त करण्याच्या पद्धतीनेही होते, असं म्हणत अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अखेर 25 जुलै 2026 रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील विद्यार्थ्यांचं आंदोलन संपुष्टात आलं. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित आनंद व्यक्त केला. यादरम्यान ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनीही एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आंदोलनादरम्यान लोकांनी वापरलेल्या अपमानास्पद भाषेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘आवाज ही लोकशाहीची सर्वांत मोठी ताकद आहे, तर भाषा हे तिचं सर्वांत मोठं सौंदर्य आहे. मतभेद असणं आवश्यक आहे, प्रश्न विचारणंही गरजेचं आहे. सरकारला जबाबदार धरणंही तितकंच महत्त्वाचं आहे. परंतु जर आपण भाषेवरील संयम गमावला, तर आपल्या संदेशाची ताकद कमी होईल’, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
काय म्हणाले अनुपम खेर?
या व्हिडीओत अनुपम खेर म्हणाले, “आंदोलन संपलं आणि आता अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. जेव्हा विद्यार्थी प्रामाणिकपणे आणि दृढ विश्वासाने आपली मतं व्यक्त करतात, तेव्हा लोकशाही त्यांचं ऐकून घेतं हेसुद्धा सिद्ध झालं. कदाचित हा संवाद आधीच होऊ शकला असता, कदाचित परिस्थिती या टप्प्यापर्यंत पोहोचली नसती. पण अखेरीस तोडगा निघाला आणि हीच लोकशाहीची सर्वांत मोठी ताकद आहे. आता पुढे जाण्याची वेळ आहे. देश एकाच टप्प्यावर थांबू शकत नाही. पण या संपूर्ण घटनेतील एका गोष्टीने आम्हा सर्वांना, विशेषत: मला खूप दु:ख झालं आहे. सार्वजनिक व्यासपीठांवर, कॅमेरासमोर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ज्याप्रकारे अपमानास्पद आणि असभ्य भाषेचा वापर करण्यात आला, ते अत्यंत दु:खद होतं.”
पहा व्हिडीओ-
“हा फक्त एका व्यक्तीचा प्रश्न नाही, तर आपण भावी पिढ्यांसाठी कशा प्रकारची संस्कृती मागे सोडू इच्छितो, हा प्रश्न आहे. आपण कोणत्याही नेत्याबद्दल निर्भीडपणे बोलू शकतो, त्यांच्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका करू शकतो आणि त्यांना प्रश्न विचारू शकतो. हाच लोकशाहीचा आत्मा आहे. पण जेव्हा वाद संपतो आणि शिवीगाळ सुरू होते, तेव्हा चर्चेला काही अर्थ उतर नाही. नरेंद्र मोदी हे गेल्या 30 वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं आहे. अर्थात त्यांच्या प्रत्येक निर्णयाशी आपण सहमत असूच असं नाही. पण पंतप्रधानांच्या पदाच्या प्रतिष्ठेचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. लोकशाहीत विरोध स्वाभाविक आहे, पण विरोधाची भाषा इतकी संकुचित झाली आहे आणि ती केवळ तरुणांपुरती मर्यादित नाही. सर्व वयोगटातील लोक या खालच्या दर्जाच्या भाषेचा भाग बनले आहेत”, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
नीट पेपरफुटी आणि परीक्षेतील अनियमितता याविरोधात सीजेपीच्या नेतृत्वाखाली तरुणांनी, विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनाच्या तीन मागण्यांपैकी एक असलेल्या केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने रविवारी आंदोलनाची सांगता झाली.