बॉलिवूड जोडप्यांमध्ये घटस्फोटामागचं नेमकं कारण काय? ए. आर. रेहमान यांच्या पूर्व पत्नीच्या वकिलाने केलं स्पष्ट

प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान आणि सायरा बानू यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर घटस्फोट जाहीर केला. गेल्या काही वर्षांत अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतलाय. आता सायरा बानू यांच्या वकिलाने त्यामागील संभाव्य कारणं सांगितली आहेत.

बॉलिवूड जोडप्यांमध्ये घटस्फोटामागचं नेमकं कारण काय? ए. आर. रेहमान यांच्या पूर्व पत्नीच्या वकिलाने केलं स्पष्ट
A R Rahman and Saira Banu
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 21, 2024 | 10:52 AM

ऑस्कर विजेते संगीतकार आणि गायक ए. आर. रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी मंगळवारी घटस्फोट जाहीर केला. लग्नाच्या 29 वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सायराने तिची वकील वंदना शाहच्या माध्यमातून घटस्फोटाच्या निर्णयाबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. हा घटस्फोट जाहीर करण्याच्या काही दिवस आधी वकील वंदना शाह यांनी एका पॉडकास्टमध्ये बॉलिवूड जोडप्यांच्या घटस्फोटामागील काही कारणं सांगितली होती. तोच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटस्फोटामागचं कारण काय?

दीपक पारीकच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत वंदना म्हणाल्या, “त्यांचं आयुष्य इतरांपेक्षा खूप वेगळं असतं. मला वाटत नाही की फसवणूक किंवा अप्रामाणिकपणा हे संसार मोडण्यामागचं कारण असेल. खरं कारण हा कंटाळा आहे. विवाहित जोडप्यांना वाटतं की त्यांनी सर्व पाहिलंय. हे बॉलिवूड आणि अतिश्रीमंत कुटुंबांसाठी खूप विलक्षण आहे. ही एक अशी गोष्ट आहे जी मी इतर बऱ्याच वैवाहिक जोडप्यांच्या आयुष्यांमध्ये पाहिली नाही.”

“दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांच्या लैंगिक अपेक्षा या खूप इतरांपेक्षा खूप भिन्न आहेत. बॉलिवूडची पार्श्वभूमी नसलेल्या वैवाहिक जोडप्यांपेक्षा त्यांच्या लैंगिक अपेक्षा खूप जास्त आहेत. तिसरं कारण म्हणजे व्याभिचार. हे खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि वन-नाइट स्टँडमध्येही काही चुकीचं मानलं जात नाही. मी बॉलिवूडचा एक भाग नाही पण माझ्याकडे आलेल्या केसेसवरून मी ही निरीक्षणं नोंदवतेय”, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

सेलिब्रिटींचे घटस्फोट

गेल्या काही वर्षांत मलायका अरोरा-अरबाज खान, सोहैल खान-सीमा सजदेह, हार्दिक पांड्या-नताशा स्टँकोविक, आमिर खान-किरण राव, मसाबा गुप्ता-मधु मंटेना, अर्जुन रामपाल-मेहेर जेसिया, समंथा रुथ प्रभू-नाग चैतन्य, जयम रवी-आरती, धनुष-ऐश्वर्या रजनिकांत या जोडप्यांनी घटस्फोट जाहीर केला. यात आता ए. आर. रेहमान आणि सायरा बानू यांचीही भर पडली आहे. या दोघांनी 1995 मध्ये लग्न केलं होतं. त्यांना खतिजा, रहीमा आणि आमीन ही तीन मुलं आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us