लग्नात समस्या, आईला कॅन्सर, सर्वच गमावत होतो..; आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना अर्जुन रामपाल भावूक

अभिनेता अर्जुन रामपाल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आईला कॅन्सरचं निदान आणि पत्नीसोबत बिघडणारे संबंध.. याविषयी बोलताना तो भावूक झाला होता.

लग्नात समस्या, आईला कॅन्सर, सर्वच गमावत होतो..; आयुष्यातील कठीण काळाबद्दल बोलताना अर्जुन रामपाल भावूक
अर्जुन रामपाल आणि त्याची पूर्व पत्नी
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 09, 2026 | 2:39 PM

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या दोन्ही ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये मेजर इक्बालची भूमिका साकारून अभिनेता अर्जुन रामपाल तुफान चर्चेत आला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो त्याच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे. अर्जुनने या मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण आणि वेदनादायी टप्प्याविषयी सांगितलं. पत्नी मेहर जेसियाशी घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचं निधन आणि आईचा कॅन्सरशी लढा.. या सर्व गोष्टींनी त्याला पुन्हा एकदा स्वत:च्या अंतर्आत्म्याशी जोडण्यास भाग पाडल्याचं तो म्हणाला.

अर्जुन रामपालने 1998 मध्ये मॉडेल मेहर जेसियाशी लग्न केलं होतं. या दोघांना दोन मुली आहेत. लग्नाच्या 21 वर्षांनंतर 20291 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर अर्जुन मॉडेल गॅब्रिएला डिमिट्रियाडेसला डेट करू लागला. हे दोघं आता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. त्यांना दोन मुलंसुद्धा आहेत. ‘कॅन्सल्ड टू क्राऊन’ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मला वाटतं जेव्हा मी आजच्यासारखा स्वत:शी जोडलेला नव्हतो, तेव्हा मला सर्वांत जास्त एकटेपणा जाणवला. माझं लग्न मोडण्याच्या टप्प्यावर होतं आणि ही एक दु:खद गोष्ट आहे, कारण माझा विश्वास आहे की प्रेम स्थिर नसतं. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी स्थिर नसतात. आपण स्थिर नसतो. आपणही सतत बदलत असतो. कधीकधी या बदलामध्ये आपण चांगल्याप्रकारे वाढू किंवा बदलू शकत नाही.”

“मला वाटतं तो माझ्या आयुष्यातील कदाचित सर्वांत अंध:कारमय काळ होता. कारण त्याच वेळी माझ्या आईला कॅन्सर झाला होता आणि मी तिला गमावत होतो. मी माझ्या जवळच्या प्रत्येकाला गमावत होतो. त्याच्या तीन वर्षांपूर्वी मी माझ्या वडिलांना गमावलं होतं. मी माझे मित्र गमावत होतो. ज्यासाठी मी इतकी मेहनत केली होती, ते सर्व काही मी गमावत होतो. जेव्हा तुम्ही सर्वकाही गमावता, तेव्हा आत्मपरिक्षण हाच एकमेव मार्ग उरतो. तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्हाला स्वत:च्या आत डोकावून हे समजून घ्यावं लागतं की तुम्ही काय बनला आहात, हे का घडलं आणि त्यात तुमची चूक काय होती”, अशा शब्दांत अर्जुन व्यक्त झाला.

याविषयी अर्जुन पुढे म्हणाला, “यात तुम्ही कोणाला दोष देऊ शकत नाही. जर तुम्ही दोष देऊ लागलात, तर आणकी दु:खी व्हाल. कारण तुम्ही आत्मपरिक्षण टाळण्यासाठी इतरांना दोष देण्याचा बहाणा करत आहात. खरी प्रगती तेव्हाच होते, जेव्हा तुम्ही तुमच्या चुका मान्य करायला शिकता.” अर्जुन रामपालची आई ग्वेन रामपाल यांचं 27 ऑक्टोबर 2018 रोजी निधन झालं. त्या शिक्षिका होत्या आणि पतीला घटस्फोट दिल्यानंतर त्यांनी एकट्यानेत अर्जुनचं संगोपन केलं होतं.

Follow Us