मेहमूद यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर अरुणा ईरानी यांनी दिलं उत्तर

| Updated on: Apr 08, 2024 | 12:56 PM

अभिनेत्री अरुणा ईरानी आणि मेहमूद यांनी गुपचूप लग्न केल्याच्या चर्चा होत्या. या चर्चांवर बऱ्याच वर्षांनी अरुणा यांनी मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या मेहमूद यांच्यासोबतच्या नात्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या.

मेहमूद यांच्यासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर अरुणा ईरानी यांनी दिलं उत्तर
Aruna Irani and Mehmood
Image Credit source: Instagram
Follow us on

ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईरानी यांना वेगळ्या कोणत्या ओळखीची गरज नाही. त्यांना आपल्या सहा दशकाच्या करिअरमध्ये जवळपास 400 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. आजसुद्धा त्या इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अरुणा ईरानी या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आल्या आहेत. एकेकाळी त्यांचं नाव मेहमूद यांच्याशी जोडलं गेलं होतं. या दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. आता बऱ्याच वर्षांनंतर अरुणा यांनी त्यावर मौन सोडलं आहे. त्याचसोबत त्यांनी नाराजीसुद्धा व्यक्त केली आहे. मेहमूद यांना गुरू मानत असल्याचं अरुणा यांनी स्पष्ट केलं.

‘झूम’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अरुणा ईरानी म्हणाल्या, “मी आणि मेहमूद यांनी सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांनी मला कॉमेडी शिकवली. मी त्यांना माझे गुरू मानायची. जेव्हा ‘कारवां’ आणि ‘बॉम्बे टू गोवा’ हे चित्रपट प्रदर्शित झाले, तेव्हा अफवा पसरली होती की मी आणि मेहमूद यांनी गुपचूप लग्न केलं. मात्र असं काहीच नव्हतं. या गैरसमजुतीमुळे मला अनेक वर्षांपर्यंत काम मिळालं नाही. यात माझी हीच चूक होती की त्यावेळी मी कोणाला स्पष्टीकरण देणं गरजेचं समजलं नाही. माध्यमांना बोलावून आम्हाला त्या सर्व चर्चा अफवा असल्याचं स्पष्ट करायला पाहिजे होतं.”

याविषयी अरुणा ईरानी पुढे म्हणाल्या, “आमच्या अफेअरच्या चर्चांनंतर मी आणि मेहमूद यांनी कधीच एकत्र काम केलं नाही. एकेदिवशी ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की या अफवांमुळे माझं रोज पत्नीशी भांडण होतंय. आता आपण एकत्र काम केलं नाही तर बरं होईल. त्यांच्या पत्नीने त्यांना माझ्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.”

हे सुद्धा वाचा

अरुणा ईरानी एका जुन्या मुलाखतीत मेहमूद यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या होत्या. “मी चुका केल्या, पण तो आता भूतकाळा आहे. कदाचित ते माझ्या लायक नव्हते किंवा मी त्यांच्या लायक नव्हती. पण आमच्यात खूप चांगली मैत्री होती. तुम्ही याला आकर्षण म्हणा किंवा मैत्री. पण आम्ही कधीच एकमेकांशी लग्न केलं नव्हतं किंवा आमच्यात प्रेमसुद्धा नव्हतं. लोकांनी आमच्या नात्याकडे चुकीच्या पद्धतीने पाहिलं”, असं त्या म्हणाल्या होत्या.