83 वर्षापूर्वी आशा भोसले यांनी गायलं होतं पहिलं गाणं, आजही ते गाणं प्रचंड चर्चेत

बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

83 वर्षापूर्वी आशा भोसले यांनी गायलं होतं पहिलं गाणं, आजही ते गाणं प्रचंड चर्चेत
Image Credit source: Social media
| Updated on: Apr 12, 2026 | 1:18 PM

Asha Bhosle : भारतीय चित्रपटसृष्टी आणि संगीतविश्वात आशा भोसले यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. गेल्या तब्बल आठ दशकांपासून त्या संगीतसेवेत कार्यरत असून त्यांनी आपल्या मोठी बहिण लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच प्रचंड लोकप्रियता आणि यश मिळवले आहे.

अलीकडेच आशा भोसले यांना प्रकृती खराब असल्यामुळे मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांनी आज वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

8 दशकांची भव्य कारकीर्द

आशा भोसले यांची कारकीर्द 80 वर्षांहून अधिक काळाची आहे. या काळात त्यांनी 12000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली असून हा एक विक्रम मानला जातो. त्यांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्येही झाली होती.

आशा भोसले यांनी अवघ्या 10 व्या वर्षी गायनाची सुरुवात केली. त्यांचे पहिले गाणे 1943 साली आलेल्या मराठी चित्रपट ‘माझा बाळ’साठी होते. “चला चला नव बाला” असे त्या गाण्याचे बोल होते. या चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायिका नाही तर अभिनेत्री म्हणूनही काम केले होते.

बॉलिवूडमध्ये प्रवेश

हिंदी चित्रपटसृष्टीत आशा भोसले यांनी 1948 साली चुनरिया या चित्रपटातून प्रवेश केला. “सावन आया” हे त्यांचे पहिले हिंदी गाणे होते. त्यानंतर 1949 मधील रात की रानी या चित्रपटातून त्यांनी पहिले सोलो गाणे गायले. 1953 साली आलेल्या परिणीता या चित्रपटातील गाण्यांनंतर त्यांना खरी ओळख मिळू लागली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

विशेष म्हणजे 92 व्या वर्षीही आशा भोसले संगीत क्षेत्रात सक्रिय होत्या. 91 व्या वर्षी त्यांनी “सैंया बिना” हे गाणे रेकॉर्ड केले होते, ज्यात त्यांच्या नात जनाई भोसलेही सहभागी होती. या गाण्याला यूट्यूबवर 1.5 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

प्रेरणादायी वारसा

आशा भोसले यांचा संगीतप्रवास हा संघर्ष, मेहनत आणि प्रतिभेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर भारतीय संगीतविश्वात अढळ स्थान निर्माण केले असून त्यांची परंपरा पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Follow Us