Asha Bhosle : जेव्हा मी त्या पल्याड असेन… निधनानंतर आशा भोसले यांची अखेरची पोस्ट व्हायरल

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. आशाताईंची सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी जीवन, संगीत आणि मोक्षाबद्दल आध्यात्मिक विचार मांडले होते. ही पोस्ट आता चर्चेचा विषय बनली आहे.

Asha Bhosle : जेव्हा मी त्या पल्याड असेन... निधनानंतर आशा भोसले यांची अखेरची पोस्ट व्हायरल
आशा भोसले यांची अखेरची पोस्ट
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 12, 2026 | 2:41 PM

विख्यात पार्श्वगायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी आज (रविवार, 12 एप्रिल) अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने फक्त देशातीलच नव्हे तर जगभरातील लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. चिरतरूण आवाज लाभलेल्या आशा भोसले या सोशल मीडियावरही खूप ॲक्टिव्ह होत्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या, त्यांच्या चाहत्यांच्या आणि अनुयायांच्या संपर्कात होत्या. इंस्टाग्रामवरील त्यांची शेवटची पोस्ट 18 मार्च रोजी होती. या पोस्टमध्ये आशाताईंनी जीवनाचा अंत आणि मुक्ती याबद्दल बरंच काही लिहीलं होतं. आशा भोसले यांच्या निधनानंतर, त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट व्हायरल झाली असून ती चर्चेचा विषय ठरली आहे.

शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाल्या होत्या आशा भोसले ?

18 मार्च रोजी त्यांनी ही शेवटची पोस्ट लिहीली, त्यासह त्यांचा एक फोटोही दिसतोय. आपल्या शेवटच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, आशा भोसले यांनी आंतरराष्ट्रीय बँड ‘गोरिलाझ’सोबतचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या पार्श्वभूमीवर एक भारतीय वस्ती, हत्ती आणि तुटलेल्या वस्तू दिसतात. या फोटोमध्ये त्या खूप शांत आणि साध्या रुपात दिसल्या. फोटोसह त्यांनी भलीमोठ्ठी कॅप्शन लिहीली होती – ‘ द शॅडॉई लाईट’ हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. वाराणसीला जाऊन आणि पवित्र गंगा नदीच्या काठावरून प्रवास करून, मी जे पाहिलं ते बारकाईने समजून घेतल्यावर, मला जीवनाचा अर्थ कळला – मी कोण आहे आणि या पृथ्वीवर मला काय करायचे आहे ( हे मला समजलं) ’असं त्यांनी लिहीलं. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या आपल्या संगीत साधनेचं वर्णन, हे जीवनाची नदी पार करण्यास मदत करणाऱ्या नावाड्यासमान केलं.

 

पुढे आशा भोसले यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “जेव्हा मी नदीच्या पलीकडे पोहोचेन, तेव्हा माझा प्रवास पूर्ण होईल. मला मोक्ष मिळेल आणि आपल्या सभोवताली तरंगणाऱ्या हजारो आवाजांचा मी एक भाग बनलेले असेन.” आशा भोसले यांच्या या शब्दांवरून असं वाटतं की कदाचित त्या आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यासाठी आध्यात्मिक रित्या तयार होत होत्या. त्या निसर्गाशी एकरूप होण्याची आतुरतेने वाट पाहत होत्या, असंही त्यांनी लिहीलं होतं.  ‘द शॅडोई लाईट’ या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी आपला संपूर्ण वारसा एकत्र आणण्याचा प्रयत्न केला .

दैवी आवाज काळाच्या पडद्याआड

लावणीपासून ते विरहगीत, भक्तीगीतपर्यंत सर्व गाणी खुबीने गाणाऱ्या, अत्यंत व्हर्सेटाईल गायिका असणाऱ्या आशा भोसले यांच्या निधनाने सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधानानंतर पंतप्रधान मोदींपासून ते राजकारणी, नेते, सेलिब्रिटी सर्वांनी शोक व्यक्त केला. ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्टी-ऑर्गन फेल्युअरमुळे आशा भोसले यांचं निधन झालं. उद्या त्यांचे पार्थिव मुंबईतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Follow Us