Ashok Saraf: आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही.., अशोक सराफ यांचा मिश्कील टोला; जेन-झींबद्दल काय म्हणाले?
Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आजच्या पिढीबद्दल भाष्य केलं. आजची पिढी कुणाचंच ऐकत नाही, असा मिश्कील टोला त्यांनी लगावला आहे. अशोक सराफ नेमकं काय म्हणाले, ते जाणून घ्या..

मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक यांचा अभिनय जितका लोकप्रिय आहे, तितकाच त्यांच्या मिश्कील आणि परखड स्वभावाचीही चर्चा होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आजची पिढी, तिची विचार करण्याची पद्धत आणि स्वत:चे निर्णय घेण्याच्या स्वातंत्र्यावर भाष्य केलं. अशोक सराफ यांच्या 80 व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपुरात भव्य नागरी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाची अमित छाप उमटवणाऱ्या अशोक सराफ यांचा या सोहळ्यात विशेष गौरव करण्यात आला. यावेळी अभिनेता आणि दिग्दर्शक पुष्कर श्रोत्रीने त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. याच संवादादरम्यान अशोक सराफ यांनी जेन-झींबद्दल आपलं मत मांडलं.
या मुलाखतीत पुष्करने अशोक सराफ यांना विचारलं, “आजच्या पिढीला काय सांगाल?” हा प्रश्न ऐकताच अशोक सराफ यांनी आपल्या खास मिश्कील शैलीत, “छान, छान प्रश्न आहे हा. आजची पिढी.. ऐकेल?” असा सवाल केला. त्यावर पुष्करने “तुमचं नक्की ऐकेल”, असं म्हटलं. त्यावरही अशोक सराफ यांनी विनोदी अंदाज कायम ठेवत, “सांगता येत नाही. आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही”, असं उत्तर दिलं. मात्र यानंतर त्यांनी केवळ टीका न करता आजच्या तरुण पिढीची बाजूही समजून घेण्याचा प्रयत्न केला. “अर्थात ऐकत नाही, याला त्यांचीही काही कारणं असतील. आम्ही म्हणतो ते पण बरोबर आहे, असंही होऊ शकतं,” असं त्यांनी नमूद केलं.
आपल्या अनुभवातून सल्ला देणं आणि समोरच्याने तो स्वीकारणं या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचंही त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. “कोणाच्या सांगण्याच्या भानगडीत पडूच नये, ही गोष्ट चांगली आहे. त्याचा काही उपयोग नाही,” असंही ते पुढे म्हणाले. “प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या बुद्धीने आणि अनुभवातून विचार करण्याचा अधिकार आहे. प्रत्येक माणसाला स्वतंत्र दृष्टीने विचार करण्याचा हा निसर्गदत्त अधिकार आहेच ना”, असा लक्षवेधी विचार त्यांनी या मुलाखतीत मांडला. त्यामुळे आजच्या पिढीवर थेट शिक्कामोर्तब करण्याऐवजी तिला स्वत:चे निर्णय घेऊ द्यावेत, चुका करू द्याव्यात आणि स्वत:चा मार्ग शोधू द्यावा, असा महत्त्वाचा संदेश अशोक सराफ यांच्या या संवादातून मिळतो.
