पायल-कृतिकाच नाही तर अरमान मलिकची आणखी एक पत्नी; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सिझन सध्या चांगलाच गाजतोय. यामागचं प्रमुख कारण म्हणजे युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी. अरमान त्याच्या दोन्ही पत्नींसोबत बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.

पायल-कृतिकाच नाही तर अरमान मलिकची आणखी एक पत्नी; कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
अरमान मलिक, पायल आणि कृतिका मलिक
Image Credit source: Instagram
| Updated on: Jun 28, 2024 | 3:53 PM

‘बिग बॉस ओटीटी 3’मध्ये स्पर्धक म्हणून पोहोचलेला युट्यूबर अरमान मलिक सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. अरमानने पायल आणि कृतिका या दोघींशी लग्न केलं आणि दोन्ही पत्नींना घेऊन तो बिग बॉसच्या घरात पोहोचला आहे. नुकतंच बिग बॉसच्या घरात पहिली पत्नी पायलने तिचं दु:ख व्यक्त केलं. “माझ्या खास मैत्रिणीशीच पतीने दुसरं लग्न केलं. त्यानंतर मी घर सोडून निघून गेले होते. आमच्यात भांडणंसुद्धा झाली होती”, असं तिने सांगितलं. दोन लग्नांवरून अरमानवर बरीच टीकासुद्धा केली जात आहे. अशातच सोशल मीडियावर एक रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. हे रेकॉर्डिंग अरमान आणि त्याच्या पहिल्या पत्नीचं असल्याचा दावा केला जातोय. ही पहिली पत्नी पायल नव्हे तर तिच्याही आधी अरमानने एकीशी लग्न केलं होतं, असं म्हटलं जातंय.

पायल मलिक हीच अरमानची पहिली पत्नी आहे, असं सांगितलं जातं. मात्र वयाच्या 17 व्या वर्षी अरमानने सुमित्रा नावाच्या एका मुलीशी लग्न केलं होतं, अशा चर्चांना उधाण आलंय. या चर्चांदरम्यान आता अरमानच्या पहिल्या पत्नीचा थक्क करणारा कॉल रेकॉर्डिंग लीक झाला आहे. या व्हायरल क्लिपमध्ये सुमित्रा रडत अरमानसोबत बोलतेय आणि त्याला तिचं दु:ख सांगतेय. तर अरमान तिच्यासोबत उद्धटपणे बोलतोय. यामध्ये पैशांवरूनही चर्चा होतेय. ऑडिओ क्लिपमध्ये सुमित्रा अरमानला म्हणते की तिच्याकडे मुलीच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत. ही क्लिप फेक असल्याचंही काहीजण म्हणत आहेत. यामागचं सत्य अद्याप समोर आलं नाही.

गेल्या वर्षी पायल आणि कृतिकाने एका व्लॉगच्या माध्यमातून अरमानच्या पहिल्या लग्नाला दुजोरा दिला होता. यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दोघांचं एकमेकांशी फार पटत नव्हतं, म्हणून त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये पायलने असंही सांगितलं होतं की तिला अरमानच्या पहिल्या पत्नीविषयी सर्वकाही माहिती होती. “अरमानने त्याच्या वयाच्या 17 व्या वर्षी लग्न केलं होतं. मात्र त्या दोघांचं एकमेकांशी पटत नव्हतं. त्यांच्यात बरेच वाद निर्माण झाले होते. म्हणून शेवटी त्यांनी नातं संपवण्याचा निर्णय घेतला. पुढे जाऊन माझ्यासोबतही असंच झालं तर मीसुद्धा विभक्त होण्याचा मार्ग निवडेन. बळजबरीने कोणीच रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही”, असं पायल म्हणाली होती.