कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा समन्स

| Updated on: Jan 20, 2021 | 11:16 PM

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी समन्स बजावला आहे. (Kangana Ranaut summoned by mumbai police)

कंगना रनौतच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा समन्स
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई पोलिसांनी समन्स बजावला आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून तिला समन्स बजावण्यात आला आहे. (Bollywood Actress Kangana Ranaut summoned by mumbai police in javed akhtar defamation case)

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक जावेद अख्तर यांनी कंगनावर मानहानीचा दावा केला होता. डिसेंबर 2020 मध्ये जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. कंगना रनौत यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तरच्या प्रतिमेला दुखविणार्‍या काही गोष्टी केल्या असल्याचा आरोप केला जात आहे.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कंगना रनौत यांना समन्स बजावले आहे. जुहू पोलिसांनी कंगना रनौतला समन्स बजावले आहे. यानुसार येत्या 22 जानेवारीला जुहू पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास सांगितले आहे.

डिसेंबर 2020 मध्ये कोर्टाने जुहू पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यानंतर 16 जानेवारीला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र 16 जानेवारीला पोलिसांनी तपासाचा अहवाल सादर करण्यासाठी अधिक वेळ मागितला. त्यानंतर कोर्टाने हा अहवाल 1 फेब्रुवारीपर्यंत देण्यास मुदतवाढ दिली आहे .

नेमकं प्रकरणं काय?

प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. कंगनाने विविध मुलाखतीत आपली बदनामी केली, असा दावा जावेद अख्तर यांनी केला. त्यांनी कंगना विरोधात अंधेरी कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला होता.

जावेद अख्तर यांनी अभिनेता ऋतिक रोशन याच्याविरोधात बोलू नये यासाठी दबाव टाकल्याचा आरोप कंगना रनौतने अनेक मुलाखतींमध्ये केला आहे. त्यामुळे या आरोपांविरोधात जावेद यांनी कोर्टात अब्रु नुकसानीचा दावा दाखल केला.

कंगनाने एका मुलाखतीत जावेद यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “एकदा जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलवून सांगितलं होतं की, राकेश रोशन आणि त्यांचे कुटुंबीय खूप मोठे लोक आहेत. तू जर त्यांच्याविरोधात माफी मागितली नाही तर तुझं नुकसान होईल. ते तुला जेलमध्ये टाकतील. त्यावेळी तुझ्या हातात काहीच राहणार नाही. त्यावेळी तुला आत्महत्या करावी लागेल, असे त्यांचे शब्द होते. त्यांना असं का वाटतं की, मी जर ऋतिक रोशनची माफी नाही मागितली तर मला आत्महत्या करावी लागेल. ते माझ्यावर इतक्या जोरात ओरडले होते की माझे पाय कापयला लागले होते”, अशी कंगना त्या मुलाखतीत म्हणाली होती.

कंगनाने अनेकवेळा जावेद यांच्यावर अशाप्रकारची टीका केली आहे. कंगनाची बहीण रंगोलीने देखील जावेद यांच्यावर सोशल मीडियाद्वारे अशाप्रकारचे आरोप केले आहेत. त्यानंतर जावेद अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचललं होतं. (Bollywood Actress Kangana Ranaut summoned by mumbai police in javed akhtar defamation case)

संबंधित बातम्या :

कंगना रनौत विरोधात जावेद अख्तर यांचा अब्रू नुकसानीचा दावा, मुलाखतींमधून बदनामी केल्याचा आरोप