बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन, मृत्यूच्या 4 दिवस आधी जगण्याचा मंत्र शिकवून गेले, व्हिडीओ पोस्ट करुन म्हणतात…

Amitabh Dayal Pass Away : बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाळ यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. वयाच्या ५१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. अखेर बुधवारी पहाटे त्यांचं निधन झालं.

बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाल यांचं निधन, मृत्यूच्या 4 दिवस आधी जगण्याचा मंत्र शिकवून गेले, व्हिडीओ पोस्ट करुन म्हणतात...
अमिताभ दयाळ (बॉलिवूड अभिनेते)
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Feb 02, 2022 | 3:33 PM

आयेशा सय्यद, मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ दयाळ (Amitabh Dayal) यांचं निधन झालं आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. आज (बुधवारी) पहाटे त्यांचं निधन झालं. बॉलिवूडच्या अनेक महान कलाकारांबरोबर त्यांनी अभिनय केला होता. अमिताभ बच्चन यांच्यापासून ओमपुरींपर्यंत आणि संजय दत्त यांच्यापासून ते जॉन अब्राहम यांच्याबरोबर त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार गेल्याची भावना व्यक्त होत आहे. काळाने एक चांगला अभिनेता खूप लवकर हिरावून नेल्याची भावना बॉलिवूड कलाकार व्यक्त करत आहेत.

अमिताभ दयाळ यांच्या पत्नी मृणालिनी पाटील (Mrunalini Patil) यांनी अमिताभ यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला. बुधवारी पहाटे साडेचार वाजता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं सांगितलं. 17 जानेवारी रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना कोरोनाही झाला होता. त्यातून ते पूर्णपणे बरे झाले होते.

मृत्यूच्या 4 दिवस आधी जगण्याचा मंत्र शिकवून गेले

आजारी असताना रुग्णालयातून त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये हॉस्पिटलमध्ये असूनही आणि मृत्यूशी झुंज देतानाही हार मानायाची नाही, असं ते सांगत होते. एकप्रकारे त्यांनी जीवन जगण्याचं मंत्रच दिला होता.

बुधवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार

अमिताभ दयाळ यांच्यावर आज (बुधवारी) संध्याकाळपर्यंत मुंबईतच अंत्यसंस्कार केले जातील. अमिताभ दयाळ यांचा जन्म बिलासपूर, छत्तीसगड येथे झाला होता. कुटुंबातील काही सदस्य बिलासपूरमध्ये राहतात. अंत्यदर्शनासाठी सध्या त्यांचे नातेवाईक मुंबईत येण्याची दयाळ कुटुंबीय वाट पाहत आहेत.

अमिताभ दयाळ यांनी ‘रंगदारी’ (2012) आणि ‘धुआं’ (2013) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. 2000 मध्ये अमिताभ दयाळ यांनी मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शिका मृणालिनी पाटील यांच्याशी सात फेरे घेतले, मात्र, लग्नाच्या 9 वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. दोघांना दोन अपत्ये आहेत. अमिताभ दयाल यांनी ओम पुरी आणि नंदिता दास यांच्यासोबत ‘कागर: लाइफ ऑन द एज’ (2003) तसेच अमिताभ बच्चन, जॉन अब्राहम आणि संजय दत्त यांच्यासोबतही चित्रपटांमधून काम केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us