बोल्ड सीन्सच्या नावाखाली माझ्याकडून..; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीचं वास्तव

चित्रांगदा सिंहने 2001 मध्ये गोल्फर ज्योती रंधावाशी लग्न केलं होतं. 'हजारों ख्वाहिशें' या पहिल्या चित्रपटाच्या वेळी ती विवाहित होती. बॉलिवूडमध्ये एण्ट्री केल्यानंतर तिच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्या होत्या. अखेर 2014 मध्ये तिने घटस्फोट घेतला. या दोघांना एक मुलगा असून त्याचं पालकत्व चित्रांगदाला मिळालं आहे.

बोल्ड सीन्सच्या नावाखाली माझ्याकडून..; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीचं वास्तव
Chitrangada Singh
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 09, 2026 | 9:22 AM

बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह लवकरच सलमान खानच्या ‘द बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान आणि चित्रांगदा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. ती सहसा तिच्या खासगी आयुष्याबद्दल माध्यमांमध्ये मोकळेपणे व्यक्त होत नाही. परंतु नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या खासगी आयुष्यातील संघर्षासोबतच आयुष्यातील त्या कठीण काळाचा उल्लेख केला, जेव्हा तिला कुटुंब आणि करिअर या दोघांपैकी एकाचीच निवड करावी लागली होती. अभिनेत्रींच्या तुलनेत जर एखादा अभिनेता सतत ब्रेक घेऊन काम करत असेल तर त्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केलं जातं, असं तुला वाटत नाही का, असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता.

‘पिपिंगमून’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत चित्रांगदा म्हणाली, “खरं सांगायचं झालं तर मला असं वाटत नाही. चित्रपटांमध्ये काम करताना मी अचानक त्यापासून दूर गेली, पुन्हा इंडस्ट्रीत आली आणि काही काम केलं. त्यानंतर पुन्हा मी कामातून ब्रेक घेतला, कारण त्यावेळी माझ्या वैयक्तिक आयुष्यात समस्या सुरू होत्या. त्यामुळे प्रत्येक वेळी मी माघार घ्यायची आणि कामातही माझं पूर्ण लक्ष नव्हतं. त्यावेळी विविध शहरांमध्ये मला सतत प्रवास करावा लागत होता. त्यामुळे अनेकदा लोकांना असं वाटलं की मी विवाहित आहे. मी यापुढे काम करेन की नाही, असा प्रश्न त्यांना पडला होता. या सर्व अडचणी असतानाही मी थोडंफार चांगलं काम करण्यात यशस्वी झाले. काही चांगले निर्माते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला ऑफर्स दिल्या. माझ्या मते अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींचं करिअर खूप छोटं असतं.”

जेव्हा तिला विचारलं गेलं की तिने बॉलिवूडमध्ये ब्रेक का घेतला होता, त्यावर ती म्हणाली, “मी माझ्या पहिल्या चित्रपटाच्या वेळीच विवाहित होते. तो चित्रपट म्हणजे फक्त एकदाच येणारा अनुभव होता. त्यावेळी माझं खासगी आयुष्य काही खास नव्हतं. मला लग्न, कुटुंब आणि खासगी आयुष्य सांभाळणं अधिक गरजेचं वाटत होतं. म्हणून मी कामापासून दूर गेली आणि तो ब्रेक जवळपास सात वर्षांचा ठरला.”

या मुलाखतीत चित्रांगदाने असाही खुलासा केला की, तिने काही चित्रपट यासाठी नाकारले कारण ‘बोल्ड’ सीन्सच्या नावाखाली तिच्याकडून दुसऱ्याच गोष्टींची अपेक्षा केली जात होती. “अनेकदा पटकथेत भूमिकेपेक्षा जास्त जोर दिसण्यावर आणि ग्लॅमरवर दिला जायचा. मला हे ठीक वाटत नाही. मला बोल्डनेसची समस्या नव्हती. परंतु कथा आणि भूमिकेची गरज असेल तरच तिथे बोल्डनेस योग्य वाटतो. मी फक्त पैशांसाठी किंवा इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी इथे आली नाही. जर भूमिका चांगली असेल तर मी अत्यंत मनापासून काम करते”, असं तिने स्पष्ट केलं.