‘दशावतार’ने करून दाखवलं! कोण म्हणतं मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही?

Dashavatar : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून त्याचे शोजदेखील वाढवण्यात आले आहेत. प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी या चित्रपटाने कमाईचा स्वत:चाच रेकॉर्ड मोडला आहे.

दशावतारने करून दाखवलं! कोण म्हणतं मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही?
'दशावतार'
Image Credit source: Instagram
Updated on: Sep 21, 2025 | 3:44 PM

‘दशावतार’मध्ये दाखवलेल्या कोकणातल्या कथेनं प्रेक्षकांना थिएटरमध्ये चांगलंच खिळवून ठेवलं आहे. तर दररोज नवीन प्रेक्षकसुद्धा जोडला जात आहे. मराठी चित्रपटांना थिएटर किंवा शोज मिळत नसल्याची नेहमी तक्रार केली जाते. परंतु आशयघन आणि दमदार चित्रपट असला की प्रेक्षक आपोआप थिएटरकडे वळतो, हे ‘दशावतार’ने सिद्ध केलंय. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाचे शोज आपणहून वाढवले जात आहेत. प्रेक्षकांची मागणी पाहता थिएटर मालकांनीही ‘दशावतार’चे शोज वाढवले आहेत. याबाबतची माहिती खुद्द चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे.

‘दशावतार’ने कमाईच्या बाबतीतही स्वत:चाच विक्रम मोडला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या शनिवारी या चित्रपटाने 2.65 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यापासून ही आतापर्यंतची सर्वाधिक कमाई आहे. 12 सप्टेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. आतापर्यंत या चित्रपटाने 12.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. रविवारच्या कमाईतही चांगली वाढ होण्याची अपेक्षा आहे. कारण चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचे शोज वाढवण्याची घोषणा केली आहे. ‘प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे उद्या अनेक चित्रपटगृहांमधले खेळ वाढवण्यात आले आहेत’, अशी माहिती ‘दशावतार’च्या इन्स्टाग्राम पेजवर देण्यात आली आहे.

सुरुवातीला 325 स्क्रिन्समधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या दशावतारचे फक्त 600 शोज होते. त्यानंतर प्रदर्शनाच्या पहिल्या शनिवारी हा आकडा 800 एवढा झाला तर रविवारी यामध्ये वाढ होऊन तो 975 शोज असा झाला होता. प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या शोजमध्ये आणखी वाढ झाली आहे.

‘दशावतार’ हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून, भावनांचा, रूढी परंपरांचा, पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘ भागो मोहन प्यारे’, ‘माझा होशील ना’, सध्याची लोकप्रिय मालिका ‘कमळी’ अशा अनेक यशस्वी मालिका देणारे आणि ‘संदूक ‘, ‘हापूस’सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाच्या कथा – पटकथा लेखनाबरोबरच दिग्दर्शनाची प्रथमच स्वतंत्रपणे धुरा सांभाळली आहे. तर गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखन केलं आहे. दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव,विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर आणि अभिनय बेर्डे अशा दर्जेदार कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात पहायला मिळते.